काश्मीरला भारतापासून फूटू देणार नाही- अमित शहा
जम्मू – जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भाजप जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे होऊ देणार नाही, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. जम्मू काश्मीरमधील पीडीपी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर पहिल्यांदाच काश्मीरच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. जनसंघाचे दिवंगत संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच जम्मू काश्मीर भारताचा भाग राहू शकले असल्याचेही शहा यांनी सांगितले.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित बलिदान दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शहा यांनी जम्मू काश्मीर हे भारताचा अविभाज्य भाग असल्याचा आणि काश्मीरला फुटून वेगळे होऊ दिले जाणार नसल्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला.
जम्मू काश्मीरला भारताशी एकसंध राखण्यासाठीच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपला जीव धोक्यात घातला आणि नंतर हौतात्म्यही स्वीकारले. त्यांचे हे हौतात्म्यच भाजपच्या कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा देत असते, असे शहा म्हणाले. जम्मू काश्मीरला एकसंध ठेवण्यासाठी झालेल्या प्रजा परिषदेच्या चळवळीचेही शहा यांनी कौतुक केले.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला.