काश्मीरबाबतच्या संयुक्त राष्ट्राच्या अहवालावर विचारपण नको
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/united-nation-1.jpg)
- भारताची संतप्त प्रतिक्रिया
संयुक्त राष्ट्र – काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्राच्या अहवालाचा उल्लेख सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानने करण्यावर भारताकडून तीव्र संताप व्यक्त केला गेला आहे. संयुक्त राष्ट्राचा हा अहवाल पूर्णपणे पक्षपाती असून संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेच्या सदस्यांना त्यावर विचारही करावा असे वाटत नाही, अशी टीका भारताने केली आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये काल पाकिस्तानच्यावतीने या अहवालाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
गेल्या काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानच्यावतीने तिसऱ्यांदा या अहवालाचा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. त्यावर भारताकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली. संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठाचा दुरुपयोग केला जाण्याचा आणखी एक प्रयत्न पाकिस्तानच्यावतीने केला गेला आहे. पाकिस्तानने छेडलेल्या मुद्दयावरील चर्चेचा अप्रत्यक्ष उल्लेख भारताने यावेळी केला.
संयुक्त राष्ट्रातील मानवी हक्क विषयक उच्चायुक्त झेद अल हुसैन यांनी काश्मीर आणि पाक व्याप्त काश्मीर विषयी 14 जूनचा अहवाल तयार केला आहे. संयुक्त राष्ट्रामधील पाकिस्तानचे कायम प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी सुरक्षा परिषदेतल्या बालके आणि सशस्त्र दलांमधील संघर्षाच्या चर्चेच्यावेळी या अहवालाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र भारताच्या कायम प्रतिनिधी तन्मया लाल यांनी कडक शब्दात याला प्रत्युत्तर दिले.
पुन्हा पुन्हा हा विषय उपस्थित करणे म्हणजे जाणीवपूर्वक काश्मीरमधील दहशतवादी संघटनांबाबतच्या परिस्थितीचा विपर्यास करण्याचा आणि काश्मीरच्या सार्वभौमत्वाला कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. असेच पूर्वी विविध व्यासपीठांवर झालेले अनेक प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत. यानंतरही या प्रयत्नांना यश येणार नाही, असे लाल म्हणाले.