काश्मीरमध्ये नव्हे, विरोधकांच्या मनात निर्बंध!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/amit-shaha.jpg)
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर तेथील मानवाधिकाराचा मुद्दा मांडणाऱ्या विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी लक्ष्य केले. निर्बंध काश्मीरमध्ये नव्हे, तर विरोधकांच्या मनात आहेत, अशी टीका शहा यांनी केली.
संकल्प फॉर्मर सिव्हिल सर्व्हट्स फोरमने येथील नेहरू स्मृती संग्रहालय व ग्रंथालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहा बोलत होते. ‘‘सध्या काश्मीरमध्ये कोणतेही निर्बंध नाहीत. काश्मीरमधील निर्बंधाबाबत विरोधक गैरसमज पसरवत आहेत. निर्बंध फक्त विरोधकांच्या मनात आहेत. काश्मीरमधील १९६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी उठवण्यात आली असून, फक्त ८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच किंवा अधिक लोकांनी एकत्र येण्यावरील संचारबंदी लागू आहे. काश्मीरमध्ये कुठेही जाण्याची लोकांना मुभा आहे. उर्वरित भारतातील अनेक लोक काश्मीरला नियमित भेट देत आहेत, असे शहा यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे दहा वर्षांत जम्मू-काश्मीर हा देशातील सर्वात विकसित प्रदेश बनेल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. जगभरातील नेत्यांनी भारताच्या जम्मू-काश्मीरबाबतच्या भूमिकेला पाठिंबा दिला, असेही शहा म्हणाले.