उत्तरप्रदेशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/178300-akhilesh-yadav-pti.jpg)
अखिलेश यादव यांची टीका
लखनौ – उत्तरप्रदेशातील कारागृहात कुख्यात गुंड मुन्ना बजरंगी याची प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांकरवी हत्या करण्यात आल्याच्या प्रकारावरून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. उत्तरप्रदेशात कायद्याचे राज्य राहिलेले नाही असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात सर्वत्र गोंधळाचे आणि अराजकतेचेच वातावरण आहे हे सरकारचे अपयश असून लोक गुंडांच्या कारवायांमुळे भयभीत झाले आहेत, इतकी गोंधळाची स्थिती उत्तरप्रदेशाने कधी पाहिली नव्हती असेही त्यांनी म्हटले आहे.
तथापी उत्तरप्रदेश सरकारचे मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी अखिलेश यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की समाजवादी पक्षाच्या राजवटीपेक्षा सध्याची राज्याची कायदा आणि सुव्यवस्था स्थिती चांगली आहे. राज्यात आज पोलिस खाते गुंडांच्या इशाऱ्यावर चालत नाही असा टोमणाही त्यांनी मारला आहे.
काल मुन्ना बजरंगीची कारागृहातच हत्या झाल्यानंतर प्रशासनाने अत्यंत वेगाने त्याची दखल घेत जेलरला निलंबीत केले असून त्याच्या अन्य चार सहकार्यांनाही निलंबीत करून या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश देण्यात आला आहे असेही त्यांनी नमूद केले.