आघाडीच्या कार्यक्रमात नेहमीच बांधिलकी जपली
अमित शहांच्या आरोपांना मेहबुबांचे प्रत्युत्तर
श्रीनगर- काश्मीरच्या विकासासंदर्भात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या आरोपांना पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपच्यावतीने पीडीपीवर खोटे आरोप केले जात आहेत. पीडीपी आणि आपण आघडीच्या किमान सामायिक कार्यक्रमांबाबत नेहमीच बांधिलकी जपली होती. भाजपनेच हे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला गेला हे तो पक्ष विसरत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे मेहबुबा म्हणाल्या.
भाजपाडून पीडीपीवर खोटे आरोप केले जात आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राजनाथ सिंह यांनी निश्चित करून दिलेल्या आघाडीच्या अजेंड्याबाबत कधीही तडजोड केली गेली नाही. जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यात आपल्या सरकारने सर्व उपाययोजना केल्या होत्या. या उपायांना भाजपकडून मान्यताही दिली गेली होती. 370 वे कलम “जैसे थे’ ठेवणे, पाकिस्तान आणि हुर्रियत नेत्यांशी चर्चा हे त्या किमान कार्यक्रमाचे भाग होते. संवादाला प्रोत्साहन, दगडफेक करणाऱ्यांविरोधातील खटले मागे घेणे आणि एकतर्फी शस्त्रसंधी या विश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाय योजना होत्या. त्याला भाजपने मान्यताही दिली होती.
जम्मू आणि लडाखबाबत भेदभाव करण्याचा आरोप खरा नाही. काश्मीर खोरे हे दीर्घकाळापासून धुमसते आहे. 2014 पूरापासून तेथील विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे तेथे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र याचा अर्थ इतरत्र कमी विकास झाला, असे म्हणता येणार नाही. आघाडी तोडण्यात भाजपने पुढाकार घेतला. ही जबाबदारी
तो पक्ष झटकत आहे. जम्मू काश्मीर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा भाजपचा निर्णय राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळती स्थिती आणि राज्य सरकारच्या अपयशाला पाहून घेण्यात आल्याचा आरोप अमित शहा यांनी केला होता.
भाजपच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घ्या
भाजपने आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घ्यावा. या मंत्र्यांनी गेल्या तीन महिन्यात कोणतीही कामगिरी केलेली नाही. राज्यातील केंद्रीय पातळीवर भेदभावाबाबत काहीही तक्रार केलेली नाही. कठुआ बलात्कार प्रकरण सीबीआयकडे सोपवणे आणि गुज्जर आणि बाकारवाल समाजाला त्रास न देण्याच्या सूचना देणे हे आपले कर्तव्यच होते, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले.