आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास
अयोध्या : ‘अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलली नाही तर आगामी निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसू शकतो’, असा इशारा आज राम जन्मभूमी आणि कृष्ण जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी दिला.
मोदी सरकारने आज चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. हे औचित्य साधून नृत्य गोपाल दास यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्येत तत्काळ राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले. ‘अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आता लगेचच मंदिर उभारणीसाठी पावले उचलायला हवीत अन्यथा भाजपला त्याची किंमत मोजावी लागू शकते’, असे महंत म्हणाले. देशातील जनतेने आणि संत-धर्माचार्यांनी राम मंदिराचे निर्माण व्हावे म्हणून भाजपच्या हाती केंद्रातील सत्ता सोपवली आहे. त्यामुळेच लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी सुरू करून केंद्र सरकारने आपले कर्तव्य पार पाडायला हवे, अशी अपेक्षाही महंतांनी व्यक्त केली.