अलिबाग किनाऱ्यावर एकही बेकायदा बंगला नको!
अलिबाग:- अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर यापुढे एकही बेकायदा आलिशान बंगला नको, असे उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला बजावले.तसेच १११ बेकायदा बंगल्यांना कारवाईपासून संरक्षण मिळाले आहे, ते हटवण्याबाबत करण्यात आलेले अपील तातडीने निकाली काढण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा न्यायालयाला दिले. याशिवाय संरक्षण नसलेल्या बंगल्यांवरील कारवाईसाठी आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध करा, असे आदेशही न्यायालयाने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
सागरी किनारा नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून अलिबागच्या सागरी किनाऱ्यावर प्रभावशाली आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी उभ्या केलेल्या आलिशान बंगल्यांकडे काणाडोळा करणाऱ्या सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी ताशेरे ओढले होते. एवढेच नव्हे, तर बंगल्यांवरील कारवाईविरोधात दिवाणी न्यायालयात किती दावे दाखल आहेत, किती प्रकरणांमध्ये बंगल्यांच्या बांधकामाला संरक्षण मिळाले आहे आणि सरकार त्यावरील स्थगिती उठवण्यासाठी काय करते आहे, या सगळ्याच्या तपशिलासह रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील सुनावणीच्या वेळी हजर राहावे, असेही आदेशही न्यायालयाने दिले होते.