‘वायू’ च्या भीतीने चीनची दहा जहाज भारताच्या आश्रयाला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/cyclone-vayu-new-1.jpg)
संभाव्य चक्रीवादळ ‘वायू’ पासून वाचण्यासाठी चीनची दहा जहाज भारताच्या आश्रयाला आली आहेत. या जहाजांना रत्नागिरीच्या बंदरागाहवर आश्रय देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक महानिरीक्षक के आर सुरेश यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की भारतीय तटरक्षक विभागाने या दहा जहाजांना सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीत राहण्यास परवानगी दिली आहे.
हवामान खात्याच्या मते अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल आहे. त्यामुळे वायू हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारी भागास १३ जून रोजी धडकण्याची शक्यता आहे. तर आगामी २४ तासांमध्ये हे वादळ अधिकच गतीमान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ते गुजरातच्या वेरावलजवळ धडकू शकते, भारतीय किनारी भागास धडकते वेळी या वादळाची गती ११० ते १३५ किलोमीटर प्रतीतास असू शकते.
तर वायू वादळाच्या तडाख्याने नुकसान होण्याची शक्यता असल्याने येथील लोकांच्या मदतीसाठी वायुसेनेचे एक विमान नवी दिल्लीहून विजयवाडा येथे एनडीआरएफच्या १६० जवानांना घेण्यास जात आहे. हे जवान गुजरातमध्ये वायू चक्रीवादळात सापडणा-या नागरिकांना मदत करणार आहेत.