भारताचा संघही लवकरच दिवस रात्र कसोटी खेळेल – सौरव गांगुली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Indian-American-plans-to-build.jpg)
कोलकाता – दिवसा खेळल्या जाणाऱ्या व दिवस रात्र पद्धतीच्या कसोटी सामन्यांमध्ये काहीही फरक नाही. केवळ चेंडूचा रंग वेगळा असतो. बाकी सगळे सारखेच असते. दिवस रात्र कसोटी हे क्रिकेटचे भविष्य आहे. त्यामुळे भारताचा संघही लवकरच दिवस रात्र कसोटी खेळेल असे प्रतिपादन भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने ऑस्ट्रेलियन दौऱ्या मधिल दिवस रात्र कसोटी सामन्यातील वादाच्या पार्श्वभुमीवर केले आहे.
भारतीय संघ 21 नोव्हेंबरपासून 3 टी 20, 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्याची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील दिवस-रात्र कसोटी सामन्याबद्दलचे वाद संपता संपत नव्हते मात्र बीसीसीआय पुढे नमत घेत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने हा सामना इतर कसोटी सामन्यांप्रमाणे दिवसाच खेळला जाईल असे घोषीत केले.
तत्पूर्वी, कसोटी मालिकेतील ऍडलेड येथे होणारा पहिला सामना दिवस रात्र पद्धतीचा असावा, असा आग्रह क्रिकेट ऑस्टेलियाने धरला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्यास नकार दिला. त्यावर उत्तर देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड यांनी भारत पराभवाला घाबरत असल्याने दिवस रात्र कसोटी खेळ नसल्याचे म्हटले होते. त्या संदर्भात गांगुलीने उत्तर देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला चपराक लगावली आहे. भारतीय संघात प्रतिभावान खेळाडू आहेत आणि ते खेळाडू दिवस रात्र कसोटी जिंकू शकतात, असा विश्वास दादाने व्यक्त केला आहे. तो म्हणाला की भारत दिवस-रात्र कसोटी खेळू शकतो आणि जिंकू शकतो.