नोटांची कमतरता भासणार नाही
नवी दिल्ली – अनेक राज्यांत रोकड टंचाई असल्याची ओरड होत असताना, भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने मोठा दिलासा दिला आहे. पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या चलनी नोटा व्यवहाराच्या दृष्टीने सोयीच्या आहेत. या नोटांची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी 3 हजार कोटी रुपयांपर्यंत दररोज पाचशे रुपये मूल्यांच्या नोटांची छपाई केली जात आहे, असे सांगत, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी आता दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची छपाई केली जात नसल्याचेही स्पष्ट केले.
असंतुलित चलनवाढ किंवा उत्पादनात विशेष वृद्धी नसल्याने, अर्थव्यवस्थेचा पायाभूत आधार व्याजदर वाढविण्यास मुभा देत नाही. मागच्या आठवड्यात देशभरातील रोकड स्थितीचा आढावा घेण्यात आला असता, 85 टक्के एटीएमच चालू आहेत. एकूणच देशभरात रोकड उपलब्धतेचे प्रमाण व्यवस्थित आहे. रोकड पुरेशी आहे. कॅशचा पुरवठाही केला जात आहे. अतिरिक्त मागणीही पूर्ण होत आहे. तेव्हा आजघडीला तरी देशात रोकडची कोणतीही समस्या नाही, असा दावाही गर्ग यांनी केला.
नोटांची नक्कल करता येऊ नये, म्हणून सुरक्षिततेशी संबंधित मानक वैशिष्ट्य्े वाढविली जात आहेत. मागच्या अडीच वर्षात देशात उच्चप्रतीच्या नकली नोटांची प्रकरणे नगण्य होती. तथापि, रिझर्व्ह बॅंक सुरक्षिततेसंबंधी नव्याने विचार करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने काम करीत आहे, असेही गर्ग म्हणाले. सध्या तरी चलनात दोन हजार रुपयांच्या 7 लाख कोटी रुपये मूल्यांच्या नोटा आहेत. गरजेपेक्षा या नोटा चलनात मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या जात नाहीत, असे सांगण्यात आले.