तीन जागा द्या, अन्यथा १५ जागा लढणार – खासदार राजू शेट्टी
मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत तीन जागांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना अल्टिमेटम दिला आहे. आघाडीच्या नेत्यांनी दोन दिवसांत याबाबत निर्णय न कळवल्यास स्वाभिमानी १५ जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवेल, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे.
लोकसभेच्या हातकणंगले, बुलडाणा आणि वर्धा या तीन जागांसाठी स्वाभिमानी पक्ष आग्रही आहे. काँग्रेस आघाडीत दाखल होण्यास उत्सुक असलेल्या राजू शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेस नेत्यांना इशारा दिला आहे. अगोदरच भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला महाआघाडीत सामील होण्याविषयी झुलवत ठेवले होते. आता राजू शेट्टी यांची त्यात भर पडली आहे. प्रकाश आंबेडकर आणि बहुजन वंचित आघाडीने २२ जागांची मागणी केल्याने आघाडीत येण्याची शक्यता कमीच दिसत आहे. त्यातच राजू शेट्टी यांनीही वेगळा मार्ग निवडल्यास महाआघाडीचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे.