काँग्रेस कार्यकर्त्याने १५ वर्षांनंतर घातल्या चपला, जाणून घ्या कारण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/congress-2-1.jpg)
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येईपर्यंत अनवाणी राहण्याचा संकल्प करणाऱ्या एका ४० वर्षीय काँग्रेस कार्यकर्त्याने मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत आपल्या पायात १५ वर्षांनंतर बूट घातले.
कमलनाथ यांनी याबाबत ट्विट केले आहे. आज निवासस्थानी राजगडचे कार्यकर्ता श्री दुर्गालाल किरार यांची भेट घेऊन त्यांना पादत्राणे दिली. जोपर्यंत राज्यात काँग्रेसची सत्ता येत नाही. तोपर्यंत पायात चप्पल घालणार नसल्याचा त्यांनी संकल्प केला होता. अशा कार्यकर्त्यांना सलाम.. जे संपूर्ण निष्ठेने काँग्रेससाठी दिवस-रात्र मेहनत करतात.
कमलनाथ यांनी या क्षणाचा फोटोही शेअर केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंहही उपस्थित होते. काँग्रेसच्या एका प्रदेश प्रवक्त्याने म्हटले की, राजगडपासून सुमारे २० किमी दूर लिंबोदा गावातील दुर्गालाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे समर्थक आहेत. दुर्गालाल यांनी १५ वर्षांपूर्वी २००३ मध्ये राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पायात बूट न घालता अनवाणी राहण्याचा संकल्प केला होता. आता १५ वर्षांनंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे दुर्गालाल यांनी कमलनाथ यांच्या उपस्थितीत आपला संकल्प पूर्ण केला आहे.
कमलनाथ यांनी १७ डिसेंबरला राज्याचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दिग्विजय सिंह वर्ष १९९३ ते २००३ पर्यंत काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात राज्याचे मुख्यमंत्री होते. २००३ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यानंतर १५ वर्षे भाजपाचे सरकार सत्तेवर होते.