नरेंद्र मोदींना घटनेचं ज्ञान कमीच – ओवेसी
हैदराबादमधील खासदार व एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवेसी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सोमवारी रात्री प्रचारसभेत बोलताना ओवेसी यांनी मोदींना घटनेचं ज्ञान नसून त्यांनी घटना वाचलीदेखील नसल्याचा आरोप केला आहे. तेलंगणा सरकार दलितांचे हक्क चोरून मुस्लीमांना आरक्षण देताना दलितांचे अधिकार चोरत असल्याचा व बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत असल्याचा आरोप मोदींनी केला होता. घटनात्मक संसदेनं अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याची कल्पना स्वीकारली नसल्याचे मोदींनी सांगितले तसेच तेलंगणामधले पक्ष तसे आश्वासन देत असल्याचा दावा केला.
तेलंगणातील राजकीय पक्ष केवळ त्यांच्याशी संबिधित कुटुंबांचे हितसंबंध जपतात असा आरोप मोदींनी केला होता. परंतु भाजपाला मात्र तेलंगणाचं हित महत्त्वाचं वाटत असल्याचा दावा त्यांनी केला होता. मोदींच्या आरोपांना उत्तर देताना ओवेसी म्हणाले की मोदींनी घटनेची १५ व १६ ही कलमं वाचावीत. तसेच अशी काही वक्तव्य करण्याआधी सुधीर आयोग, मिश्रा आयोग व सच्चर समितीचे अहवाल वाचावेत किंवा घटनाविषयत तज्ज्ञांशी सल्लामसलत करावी असा सल्ला ओवेसींनी दिला आहे.
ओवेसींनी मोदींप्रमाणेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींवरही हल्ला चढवला. जानवेधारी काँग्रेस प्रमुखांना मुस्लीम म्हणजे काँग्रेसची मालमत्ता वाटते असे सांगत ते दिवस गेले असं ओवेसी म्हणाले. मुस्लीमांना काँग्रेसची गरज नसून या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव अटळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
असदुद्दिन यांचा धाकटा भाऊ अकबरुद्दिन विधानसभेची निवडणूक लढवत असून त्यांनीदेखील मोठ्या भावाची री ओढली आहे. त्यांनी योगी आदित्यनाथांवर टीका करताना, भाजपानं नीरव मोदी, मेहुल चोक्सी व विजय माल्याला देश सोडून जाण्यास मदत केली व आता ते असदुद्दिन ओवेसींना घालवण्याच्या गोष्टी करत आहेत असे सांगितले. तेलंगणामध्ये डिसेंबर ७ रोजी मतदान होणार असून ११ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.