ममता बॅनर्जींना एकापाठोपाठ दोन मोठे धक्के! नंदिग्रामनंतर रेजीनगरमधूनही तृणमूल उमेदवाराची माघार

Mamata Banerjee | पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवले गेलेले असतानाच, आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या गटाला एकापाठोपाठ एक मोठे राजकीय धक्के बसत आहेत. नंदिग्राम मतदारसंघातील उमेदवार संचिता प्रधान यांनी माघार घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांतच आता रेजीनगर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे अधिकृत उमेदवार रबीउल आलम चौधरी यांनीही शनिवारी (१९ सप्टेंबर) निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर रबीउल आलम चौधरी यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, ममता बॅनर्जी यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पक्षाचे मूळ नाव आणि चिन्ह गोठवले गेल्यामुळे निर्माण झालेली कायदेशीर गुंतागुंत, तसेच पक्षाशी निष्ठावंत असणाऱ्या कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
“आश्रमशाळांची अवस्था म्हशीच्या गोठ्यापेक्षाही वाईट”; अभिजीत दिपके संतापले
माघारीचे कारण स्पष्ट करताना चौधरी म्हणाले, “पहिली बाब म्हणजे आम्हाला संपूर्ण नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागत आहे. दुसरीकडे आमच्या कार्यकर्त्यांचा सातत्याने छळ केला जात असून त्यांना धमकावले जात आहे आणि बेकायदेशीरपणे अटकही केली जात आहे. जर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनाच संरक्षण देऊ शकत नसू, तर अशा भयानक वातावरणात आम्ही निवडणूक कशी लढवणार? म्हणूनच मी निवडणुकीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. याबाबत मी ममता बॅनर्जी यांच्याशी बोललो असता, जे परिस्थितीनुसार योग्य वाटेल तेच करा, असा सल्ला त्यांनी मला दिला.”
नंदिग्राममध्ये काँग्रेसला पाठिंबा; आता रेजीनगरमध्ये काय?
विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधून संचिता प्रधान यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी अचानक माघार घेतल्याने तिथे ममतांच्या गटाने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की ओढवली. आता रेजीनगरमधूनही रबीउल आलम चौधरी यांनी माघार घेतल्याने पोटनिवडणुकीच्या मैदानात ममता बॅनर्जी यांच्या गटाची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.





