मराठी न येणाऱ्या चालकांविरोधात सरकारचं मोठं पाऊल, राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू
पहिल्याच टप्प्यात 1,268 चालकांना नोटीस; 30 सप्टेंबरपर्यंत तपासणी मोहीम, त्यानंतर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई : ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्या व्यावसायिक चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे राज्य सरकारने अनिवार्य केले आहे. चालक आणि प्रवाशांमधील संवाद अधिक सुलभ आणि प्रभावी व्हावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने गुरुवारपासून संपूर्ण राज्यात विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसलेल्या 1,268 चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबई आणि उपनगरात 604 चालकांना नोटीस
मुंबई आणि उपनगरात मोठ्या संख्येने रिक्षा चालक कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या पथकांनी मुंबई महानगर प्रदेशात (MMR) विशेष तपासणी केली. या मोहिमेत 3,995 वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 604 चालकांना दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान नसल्याचे आढळून आले. या चालकांना तत्काळ नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये 664 चालकांवर कारवाई
मुंबई आणि उपनगर वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही परिवहन विभागाने तपासणी केली. या भागात 4,222 चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 664 चालकांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याने नोटीस देण्यात आली आहे.
राज्य सरकारने यापूर्वी अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकता यावी, यासाठी विशेष उपक्रमही सुरू केला होता. चालकांना भाषा शिकण्यासाठी संधी आणि पुरेसा वेळ देण्यात येत असतानाही काही चालकांना मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे.
हेही वाचा – आदिनाथ कोठारेच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ‘रामायण’नंतर ‘नई नवेली’मध्येही महत्त्वाची भूमिका
चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ आणि संधी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मोहिमेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशासन चालकांबाबत सहानुभूतीची भूमिका घेत असून, त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ही विशेष तपासणी मोहीम 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत चालकांना नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक संधी दिली जाणार आहे.
मुदत संपल्यानंतर कठोर कारवाईचा इशारा
निर्धारित मुदत संपल्यानंतरही एखादा चालक मराठी भाषेच्या नियमाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्याविरोधात कठोर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
चालकांना मराठी शिकण्यासाठी वेळ दिला जात असला, तरी नियमातून सुटण्याची कोणतीही संधी दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरनंतर परिवहन विभागाच्या कारवाईकडे आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लक्ष लागले आहे.





