संजय राऊतांचा लाडकी बहीण योजना आणि कॅगचा अहवाल यावरुन राज्य सरकारवर टीका
सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले आहेत.एक नंबरचे खोटारडे आहात, हे जनतेच्या लक्षात आले आहे
महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. या निवडणुकीत महायुतीची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चांगलीच चर्चेत आहे. या योजनेतंर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. तसेच आता लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्यात आला आहे. लवकरच हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेचे काही निकष बदलण्यात आले आहेत. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा अतिरिक्त बोजा हा सरकारी तिजोरीवर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाने निशाणा साधला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजना आणि कॅगचा अहवाल यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले आहेत. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे जनतेच्या लक्षात आले आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला आहे.
राज्याची आर्थिक स्थिती नीट नसणे हे सरकार म्हणून तुमचे अपयश आहे. त्याचे खापर लाडक्या बहिणींवर का फोडत आहात? ‘कॅग’नेही ताशेरे ओढले आहेत ते तुमच्या आर्थिक धोरणांवरच. तेव्हा लाडक्या बहिणींच्या नावाने गळा काढत कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा गळा आवळण्याचे उद्योग थांबवा! लाडक्या बहिणींना नवीन निकषांचा तर शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा बागुलबुवा दाखविणे बंद करा! घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आलात खरे, परंतु लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले आहेत. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे जनतेच्या लक्षात आले आहे, असे सामना अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय?
“राज्यातील विद्यमान राज्यकर्त्यांचा बुरखा रोजच टराटरा फाटतो आहे. मग ते संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, राज्यातील कायदा-सुव्यवस्था असो, लाडकी बहीण योजना असो, की शेतकरी कर्जमाफी. प्रत्येक बाबतीत राज्य सरकार रोजच उघडे-नागडे होत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री ‘तपास सुरू आहे’, ‘कोणालाही सोडणार नाही’ हेच डमरू वाजवीत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सर्व मंडळी राज्यातील तमाम ‘लाडक्या बहिणीं’चे ‘लाडके भाऊ’ वगैरे झाले होते. या योजनेवरून त्यांनी स्वतःच स्वतःला पंचारती ओवाळून घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत या मंडळींना जे यश मिळाले त्यात मोठा वाटा याच लाडक्या बहिणींचा आहे, असे ते मोठ्या तोंडाने सांगत होते. मात्र आता सत्तेत बसल्यावर यांच्या मोठ्या तोंडाचा चंबू झाला आहे आणि लाडक्या बहिणींना ‘निकषां’च्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग त्यांनी सुरू झाले केले आहेत. या चाळणीतून सुमारे 50 लाख ‘लाडक्या’ बहिणी ‘नावडत्या’ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच निकषांत न बसणाऱ्या बहिणींना अपात्र ठरवून त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत सरकारजमा करण्याच्या ‘सावकारी’ला सुरुवातदेखील झाली आहे”, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी उफाळून आलेले सत्ताधाऱ्यांचे ‘बंधूप्रेम’ सत्तेत बसताच असे आटत चालले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरूनही या मंडळींनी घूमजाव केले आहे. खुद्द राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ‘ताण’ पडत असल्याने शेतकऱ्यांनी कर्जमाफी विसरावी, असे जाहीर करून हात वर केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणी, आशा सेविकांपासून शेतकऱ्यांपर्यंत घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला होता. शेतकरी कर्जमाफी देणार म्हणजे देणारच, असा आव भाजपने जाहीरनाम्यात आणला होता. तुमचा तो आव आता कुठे गेला? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.





