इस्लामपुरात निशिकांत भोसले-पाटील यांचा प्रचाराचा झंझावात
लढतीकडे राज्याचे लक्ष; ऊस दराचा मुद्दा कळीचा
![Nishikant Bhosale-Patil's campaigning in Islampur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Nishikant-bhosale-Patil-780x470.jpg)
सांगली | इस्लामपूर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे आ. जयंत पाटील व महायुतीचे निशिकांत भोसले-पाटील(दादा) यांच्यात काट्याची लढत होत आहे. आ.जयंत पाटील यांचे काही मोहरे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर निशिकांत भोसले-पाटील यांच्या गटात गेले आहेत. इस्लामपुर, आष्टा शहरातसह ग्रामीण भागात महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. खा. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघातील महायुतीच्या नेत्यांची मोट बांधल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे.
निशिकांत भोसले-पाटील यांनी अपक्ष म्हणून गत निवडणूक लढवली होती. आता, राष्ट्रवादी कडून त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली आहे. गेल्या आठवड्यात खा. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे आनंदराव पवार, भाजपचे राहूल महाडिक, हुतात्मा गटाचे गौरव नायकवडी आदींची महत्वाची बैठक घेतली. सर्वजण निशिकांत पाटील यांच्या प्रचारात जोरकसपणे उतरले आहेत. इस्लामपूर शहरासह मतदारसंघात प्रचार आघाडी घेतली आहे. आ.जयंत पाटील विरोधक एकत्र आल्याने ही निवडणूक आ. पाटील यांना तेवढी सोपी जाणार नसल्याची चर्चा आहे.
इस्लामपूर ,आष्टा शहरात जवळपास एक लाखा पेक्षा जादा मतदान आहे.सद्यस्थितीत तर निशिकांत भोसले-पाटील(दादा)यांच्या भाषणातील मुद्दे मतदारांना परिवर्तनाच्या विचारापर्यत पोहचवत आहे,त्यामुळे दोन्ही गटाकडून या शहरांवर लक्ष केंद्रीत केली आहे. इस्लामपूर शहरात माजी नगरसेविका मनिषा पाटील, जयवंत पाटील व आ.जयंत पाटील यांचे खंदे समर्थक माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे व अन्य माजी नगरसेवक,गोटखिंडीचेप्रदीप थोरात यांनी निशिकांत भोसले-पाटील(दादा)यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे इस्लामपुरात निशिकांत भोसले पाटील यांच्या गटाची मोठी ताकद वाढली आहे. तर गेल्या पाच- सहा वर्षांपासून आष्टा व परिसरात निशिकांत दादा युथ फौंडेशन च्या युवा कार्यकर्त्यांची फौज तयार केली आहे.तेथे निशिकांत भोसले- पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा – भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
इस्लामपुरातील रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
इस्लामपूर व आष्टा शहरात दोन दिवसापुर्वी महायुतीच्या निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ वतीने भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचे आनंदराव पवार, भाजपचे राहूल महाडिक, माजी नगरसेविका मनिषा पाटील, जयवंत पाटील, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, अमित ओसवाल, शिवसेनेचे सागर मलगुंडे, मनसेचे सनी खराडे, अशोक खोत, सतेज पाटील, सुरज पाटील,गजानन फल्ले,संजय पोरवाल,भाऊसो पाटील, मनोज ओसवाल, अजित पाटील,अक्षय पाटील आदींसह शहरातील महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीत युवावर्गाची उपस्थिती शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
दिवाळीला ऊस बील न मिळाल्याने अर्थचक्राला ‘ब्रेक’
या निवडणुकीत ऊस दराचा मुद्दा कळीचा ठरला आहे. शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांवरदेखील अप्रत्यक्षपणे या दराचा परिणाम झाला आहे. ऊस दरावरच येथील अर्थकारण फिरत असते.राज्यात हा तालुका ऊस उत्पादनाचा पट्टा समजला जातो. येथील बहुतांश शेतकरी हा ऊस शेतीवर अवलंबून असतो.कष्टाची तयारी असल्याने एकरी १००-१२० टन ऊस उत्पादन घेणारी शेतकरी या मतदार संघात आहेत.दिवाळीला ऊस बिले न मिळाल्याने येथील अर्थचक्राला मोठा ब्रेक मिळाला आहे.शेतकऱ्यांचे अर्थचक्र फिरले तरच व्यापाऱ्यांचे अर्थचक्र फिरते. त्यामुळे त्यांनाही याचा फटका बसला आहे.,
कोंडावळ्याला लोक कंटाळले…
गेल्या पाच – दहा वर्षांपासून आ. जयंत पाटील यांच्या बाजूच्या कोंडावळ्याला लोक कंटाळले असल्याची मतदारसंघात चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत पाटील यांच्या मागे मोठी ताकद उभी केली आहे. अनेक सामाजीक संघटनांनी पाठींबा देवुन परिवर्तनाच्या लढाईला पाठिंबा दर्शविला आहे. निशिकांत पाटील यांचा प्रचाराचा झंझावात बघता व ऊस दर, मतदार संघातील दुरावस्था, बेरोजगारी या प्रश्नामुळे जयंत पाटील यांना विरोध वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.