ताज्या घडामोडीमुंबई

स्थानिकांच्या रोजगारासाठी काढलेल्या मोर्चामध्ये भाजप आणि शिवसेना पक्षांचे नेते सामील

भूमिपूत्रांना रोजगार नाकारला जात असल्याच्या विरोधात भूमिपूत्रांमध्ये तीव्र संताप

ठाणे : ठाणे येथील कोलशेत भागातील स्थानिकांच्या रोजगारासाठी शनिवारी ग्रामस्थानी काढलेल्या मोर्चामध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचे नेते सामील झाले होते. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या या दोन्ही पक्षांचे नेते मोर्चात एकत्रितपणे दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून यानिमित्ताने शहरातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

कोलशेत भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी अनेक वर्षांपूर्वी कंपन्यांकडून मातीमोल किंमतीत ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर या कंपन्यांच्या व्यवस्थापनाने कंपन्या बंद करून बिल्डरांना नफा कमवून जागांची विक्री केली. या बिल्डरांकडून मोठमोठी संकुले आणि मॉल उभारले जात आहेत. परंतु या भागातील स्थानिक तरुण-तरुणींना रोजागार दिला जात नसून, गुंडांच्या टोळ्या तैनात करून दहशत पसरविली जात आहे, असा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. स्थानिक भूमिपूत्रांना रोजगार नाकारला जात असल्याच्याविरोधात भूमिपूत्रांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून त्याविरोधात ग्रामस्थांनी संघटीत होऊन ओबेरॉय रियल्टीविरोधात गुरुवारी मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान बिल्डरच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन स्थानिक तरुण-तरुणींना रोजगार देण्याची मागणी करण्यात आली.

कोलशेतमधील स्थानिकांनी हा मोर्चा काढला असला तरी या मोर्चात भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते एकत्रितपणे सामील झाल्याचे चित्र दिसून आले. भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मनोहर डुंबरे, कविता पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे हेही उपस्थित होते. राज्याच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप, टीका आणि टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असे असतानाच, या दोन्ही पक्षाचे नेते कोलशेतमधील स्थानिकांच्या रोजगारासाठी काढलेल्या मोर्चात एकत्रितपणे दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून यानिमित्ताने शहरातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या संदर्भात ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

कोलशेत भागातील स्थानिकांच्या रोजगारासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमच्या पक्षाचे नेते सामील झाले होते. तसेच काही स्थानिकांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना बोलविल्यामुळे तेही मोर्चात सामील झाले होते. त्यामुळे एकत्रित मोर्चा काढण्याचा प्रश्न येत नसून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा हा आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा असल्याने त्यात आम्ही सहभागी झालो होतो. – मनोहर डुंबरे, भाजपचे माजी नगरसेवक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button