प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य
मुंबईतील 99 टक्के जागांवर मविआची सहमती झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला
महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. कोणत्या पक्षाची कुणासोबत युती होईल, याचा भरोसा नाही. तसेच कोणत्या पक्षाची कुणासोबत काडीमोड होईल, याचाही अंदाज नाही. राज्यातलं राजकारण अनिश्चित असं आहे. कारण गेल्या पाच वर्षांमधील घडामोडी तरी तेच सांगत आल्या आहेत. या घडामोडींनी सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा मोठमोठे धक्के दिले आहेत. यानंतर हे धक्के आता पुन्हा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यानुसार मविआत जागा वाटपावरुन खटके उडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआत काय-काय घडामोडी घडतात? याकडे राज्याचं लक्ष असणार आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वेगळा दावा केला आहे. मुंबईतील 99 टक्के जागांवर मविआची सहमती झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय.
संजय राऊत यांनीदेखील महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत भाष्य केलं आहे. मुंबईतील 99 टक्के जागांवर मविआची सहमती झाली असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. मुंबई पुन्हा आमच्या ताब्यात असणं गरजेचं आहे. त्यानुसार जागा वाटप होणार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन थोडा वाद होणं अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख पक्षांची काल मुंबईतील जागांच्या अनुषंगाने जागा वाटपासाठीची बैठक पार पडली. या बैठकीत सुरळीत चर्चा झाली. जवळपास 99 टक्के जागांवर आमची सहमती झाली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. मुंबई पुन्हा एकदा आमच्या ताब्यात असणं यावर आमची सगळ्यांची सहमती झाली. त्या पद्धतीनेच आम्ही हे जागा वाटप करत आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. पण शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही ठिकाणी जागा वाटपावरुन वाद होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “विधानसभेच्या 288 जागा आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे काही वादल होणं अपेक्षितच आहे. त्यामुळे त्याची चर्चा होणं, त्याबद्दल वाद होणार नाही, असं होणार नाही. पण शेवटी आम्हाला एकत्र राहायचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढू”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.





