TO THE POINT । हिंदू असल्याची लाज वाटते का?
पिंपरी-चिंचवडमधील हिंदू जनगर्जना मोर्चाकडे ‘या’ नेत्यांची पाठ : महाविकास आघाडीच्या नेत्यांना अन्य धर्मियांच्या रोषाची भिती
-
बांगलादेशातील हिंदूवरील अत्त्याचार हा सामाजिक मुद्दा नाही का?
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
‘‘मी हिंदू आहे आणि मला असे म्हणायला लाज वाटत नाही. हिंदू असणे पाप आहे का?’’, असा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी एका मुलाखतीमध्ये उपस्थित केला होता. नारायणन ना कोणते साधू-संत होते… ना हिंदूत्ववादी राजकीय नेते… त्यांनी आयुष्यभर विज्ञानाची सेवा केली. मात्र, आपला धर्माभिमान कायम जपला. परंतु, अलिकडच्या काळामध्ये ‘‘मी हिंदू आहे… असं अभिमानाने सांगू शकतो किंवा हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बोलू शकतो..’’ असे म्हणणं म्हणजे सामाजिकदृट्या मागासपणाचे लक्षण समजले जावू लागले आहे.
बांगलादेशातील निष्पाप हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये विशाल हिंदू जनगर्जना मोर्चा रविवारी काढण्यात आला. सकल हिंदू समाज, पिंपरी-चिंचवड अशा ‘बॅनर’खाली काढलेल्या या मोर्चात भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आमदार, शिवसेना शिंदे गटाचे खासदार यांच्या व्यतिरिक्त अन्य पक्षाचे नेते फिरकलेसुद्धा नाहीत. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, भाऊसाहेब भोईर, भाजपाचे चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, अपक्ष राहुल कलाटे, सीमा सावळे, मनसेचे सचिन चिखले, तसेच शरद पवार गटाचे तुषार कामठे, सुलक्षणा शिलवंत, अजित गव्हाणे, मयूर जाधव, देवेंद्र तायडे, शिवसेना ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, ॲड. गौतम चाबुकस्वार अशा इच्छुकांची यादी मोठी आहे. पण, या पैकी एकाही नेत्याने हिंदूंवरील अत्याचाराबाबत काढलेल्या मोर्चात सहभाग घेतला नाही, ही बाब संतापजनक आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक इच्छुक उमेदवारांनाही ‘हिंदू’ असल्याचा सोयीस्कर विसर पडला. मात्र, हा मोर्चा ना कुठल्या पक्षाने काढला होता.. ना कोणत्या नेत्याने… ‘सकल हिंदू समाज’ अशी साधे-सोपे व्यासपीठ होते. पण, हे व्यासपीठ महाविकास आघाडीतील राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांनी टाळले. कारण, हिंदू… म्हटलं की, त्याला राजकीय रंग आलाच. हिंदूत्त्वाचा पुरस्कार करणे म्हणजे अन्य अल्पसंख्य समाजाची नाराजी ओढावून घेणे… मग, हे राजकीय दृष्टया अपायकारक ठरणार… या भितीने स्थानिक राजकीय नेते या मोर्चात सहभागी झाले नाहीत.
बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूवर सुरू असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ तसेच हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील सकल हिंदू समाजातर्फे विशाल हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. चिंचवड स्टेशन येथील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे पुतळा चौक ते पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत हा विशाल मोर्चा काढण्यात आला. शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
‘हिंदूत्व’ ही कुणाची मक्तेदारी नाही…
भारतीय राजकारणामध्ये “हिंदुत्व या शब्दाच्या अर्थाला पूजा-अर्चेशी जोडून संकुचित केले आहे. हा शब्द आपल्या देशाची ओळख आहे. हा शब्द आपल्या परंपरेचा भाग आहे. हिंदू कोणत्याही एका संप्रदायाचे नाव नाही. कोणत्याही एका प्रांतात जन्म झालेला हा शब्द नाही. ही कुणाची जहागीर नाही किंवा कोणत्याही एका भाषेचा पुरस्कार करणारा हा शब्द नाही.” “आपण भारत एक हिंदू-राष्ट्र आहे’’, असे म्हटले की, हिंदूंव्यतिरिक्त अन्य धर्मीयांच्या मनातील धर्मनिरपेक्षता जागी होते. पण, एक बाब समजून घेतली पाहिजे. हिंदूत्व ही राजकीय संकल्पना नाही. ‘हिंदू राष्ट्र’मध्ये हिंदूंशिवाय इतर कुणीच राहणार नाहीत, असा अर्थ काढण्यात येतो आहे, हा एक राजकीय कट आहे आणि देशातील सर्वधर्मीय व बहुसंख्य हिंदू या कटाचे शिकार झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पिंपरी-चिंचवडमधील सकल हिंदू समाजाने जे कालच्या मोर्चात सहभागी झाले नाहीत त्यांना ‘हिंदू असल्याची लाज वाटते का?’ हा प्रश्न विचारला पाहिजे… कारण, हिंदूंवरील अत्याचाराविरोधात काढलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना लाज वाटत असेल, तर त्याचे उत्तर आगामी विधानसभा निवडणुकीत सकल हिंदू समाजाने अगदी न विसरता दिले पाहिजे…!