मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नाही : छगन भुजबळ
छगन भुजबळ यांची मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका
![Maratha, Samaj, OBC, Reservation, Chhagan Bhujbal,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/maratha-780x470.jpg)
महाराष्ट्र : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगलीत ओबीसी मेळाव्यात महत्त्वाचं वक्तव्य केलं. छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नसल्याचं छगन भुजबळ म्हणाले. यासाठी भुजबळांनी ते कसं शक्य नाही? हे देखील पटवून देण्याचा प्रयत्न केला. “महायुतीचं सरकार आहे. मी तुम्हाला नक्की सांगतो. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही म्हणजे नाही. ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. चार-चार आयोगांनी ते शक्य नसल्याचं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शक्य नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही 54 टक्के, बिहारमध्ये मोजले तर 63 टक्के निघाले, बाकीचे कमिशन वगैरे मी मानत नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“घाईघाईने त्यावेळी सुप्रीम कोर्टात खानविलकर नावाचे जज बसले होते. त्यांनी 15 दिवसांत इम्पेरिकल डाटा आणि नाहीतर निवडणुका घ्या, असं म्हटलं. 92 नगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या, त्यात एकसुद्धा ओबीसी नाही. आम्ही 54 टक्के पेक्षा जास्त आहोत. तुम्ही मोजा. आम्ही 54 टक्के असून 27 टक्के आरक्षण दिलं आणि भरलं किती? 27 टक्के आरक्षणासमोर साडेनऊ टक्के आरक्षण भरलं. मग आमचा बॅकलॉग किती आहे? आमचा बॅकलॉग भरा मग वेगळ्या आरक्षणाचा विचार करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींना धक्का लागणार नाही म्हणून जाहीर केले आहे. तुम्हाला कोणीच ओबीसीमधून आरक्षण देणार नाही. विचारा शरद पवार, उद्भव ठाकरे यांना, मराठ्यांना कोणीच ओबीसीमधून आरक्षण देणार नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.
भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल
“छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि आपल्याच लोकांवर हल्ले करतात. तिथला नवा नेता हा मागच्या ऑगस्ट, सप्टेंबर दोन महिने मला शिव्या देत होता. मी काही बोललो नाही. पण बीडला त्याने आमदारांची घरे जाळली, ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल जाळले, हल्ले केले, त्यांच्या बायका-पोरांचे जीव धोक्यात टाकले. त्यांच्या घरांची राखरांगोळी केली. त्यावेळी छगन भुजबळ तिथे गेला आणि सांगितलं की, छगन भुजबळ आता गप्प बसणार नाही. तुम्ही अशा रितीने ओबीसी आणि सर्वांना वेठीस धरु शकत नाहीत. तुम्हा लोकांची घरेदारे जाळण्याचे काय अधिकार आहेत?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
“छगन भुजबळ तिथे गेला. अंबडच्या लोकांनी सांगितलं की, भुजबळ साहेब मिटिंग घ्यायची. कुठे? हा जो नवा नेता आहे ना, तिथेच बैठक घ्यायची. 16 तारखेला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 17 तारखेला अंबडला लाखो लोकांची जाहीर सभा घेतली. मी सांगितलं, मी, आमदार नंतर, आधी हा महाराष्ट्र वाचायला हवा. गागावातून हल्ले होत आहेत. आमच्या न्हावी बांधवांच्या घरावर हल्ले होत आहेत, लहान मुलांची डोके फोडली जात आहेत. अनेकवेळा त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत. काय चाललं आहे, कशासाठी? आम्ही सांगितलं की, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आम्हाला काही नको”, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.