‘आमदारांच्या गाड्या फोडणे हा राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न’; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
![Prakash Ambedkar said that vandalizing MLAs' cars is an attempt to create riots in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Prakash-Ambedkar--780x470.jpg)
Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चैत्यभूमि, मुंबई येथून प्रारंभ झालेल्या बहुचर्चित ‘आरक्षण बचाव यात्रा’चे मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी पार पडलेल्या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केले. राज्यातील दोन आमदारांच्या गाड्या फोडणे हा राज्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न होता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी आमदार अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावरील हल्ल्याचा संदर्भ देत यावर भाष्य केलं. ते म्हणाले, या दोन घटनाद्वारे राजकीय भांडण हे सामाजिक भांडण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार अमोल मिटकरी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्या फोडणे हा दंगल घडविण्याचा एक भाग होता, असं ते म्हणाले.
हेही वाचा – महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा! वर्षभरानंतर डाळींच्या दरात ‘इतकी’ घसरण
ज्यांना आपण सत्तेवर बसविले ते आपल्या विचारांचे नसेल तर वाटोळे व्हायला व्हायला वेळ लागणार नाही. पुढे ते म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी ७ ऑगस्टला ओबीसी आरक्षण जाहीर केले. त्यामुळे एक पिढी सत्तेत आली. मात्र आता धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आले आहे, असा इशारा आंबेडकर यांनी यावेळी बोलताना दिला. आता अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धोका आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ओबीसीची मागणी आहे की जनगणना व्हायला पाहिजे. ओबीसी आणि ओबीसीला मानणारे शंभर आमदार विधानसभेत गेले पाहिजे.राहिलेले ५७ आमदार हे अनुसूचित जाती, जमातीचे आहेत. यात ५७ आमदार वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले पाहिजेत. ते पण ओबीसींच्या मतांवर निवडून आले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. असे झाल्यास आगामी काळात सत्ता आपलीच आहे, असा आशावाद आंबेडकर यांनी यावेळी बोलून दाखविला. आपल्याला मतदान ओबीसी म्हणून करून घ्यायचे आहे.जो पक्ष आपली भूमिका घेत नाही तो आपला पक्ष नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.