‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर….’; आरक्षणाच्या विषयावर काय म्हणाले राज ठाकरे?
सोलापूर : “निवडणुकीच्या दृष्टीने माझा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. प्रत्येक मतदारसंघाची छानबीन, परिस्थितीचा आढावा घेणं सुरु आहे. येत्या विधानसभेला मनसे 225 ते 250 जागा लढवेल” असं पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. ते सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे आरक्षणाच्या विषयावर सुद्धा बोलले. राज्यात जातीयवादी वातावरण आहे, मराठवाड्यात जास्त जातीयदवादी परिस्थिती आहे, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, “मूळात हा विषय शिक्षणाचा, नोकरीचा आहे. महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. यात जात येते कुठे? मग, तो ओबीसी असो किंवा मराठा. कुठल्याही जातीचा असो, महाराष्ट्रात मुला-मुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे”
“महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य आहे. महाराष्ट्रात जितक्या नोकऱ्या उपलब्ध होतात, तितक्या दुसऱ्या कुठल्या राज्यात होतात, असं वाटत नाही. खासगी संस्था आहेत, तिथे आरक्षण आहे का?. नेमकं किती प्रमाणात आरक्षण आहे, किती जातींना मिळणार? किती नोकऱ्या उपलब्ध होणार? हे पण आपण तपासणार आहोत का? की, माथी भडकवून मत मिळवायची एवढाच उद्योग आहे” असं राज ठाकरे म्हणाले. “हे सर्व राजकारण कोणाच्या तरी खांद्यावर बंदुक ठेऊन चालू आहे. मत हवीत या पलीकडे ओबासी, मराठा मुला-मुलींचा विचार यामध्ये नाहीय. हे फक्त मतांच राजकारण आहे. प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घ्यावी, हे आपल्याला मूर्ख बनवतायत. याने हाताला काही लागणार नाही” असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – पिंपरी- चिंचवड शहरातील पूर परिस्थिती; पार्थ पवारांनी घेतला आढावा
“बाहेरच्या राज्यातून मुल येतात. आपल्या नोकऱ्या बळकावतात. आपल्या राज्यात शिक्षण घेतात, आपल्या मुला-मुलींना शिक्षण, रोजगार मिळत नाही, याचा आपण विचार केला पाहिजे” असं राज ठाकरे म्हणाले. “आपण भरकटत चाललो आहोत, हे नुसतं भरकटणं नाही, हे विष कालवणं आहे. हे भीषण आहे. उद्या शाळा कॉलेजपर्यंत हे वातावरण जाणार, अस वातवरण महाराष्ट्रात कधी नव्हतं. हे लोण महाराष्ट्रात यावं, महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, ते राज्य जातीपातीमध्ये खितपत पडावं, यापेक्षा दुर्भाग्य नाही” असं राज ठाकरे म्हणाले.
“अशा प्रकारच राजकारण करणाऱ्या लोकांना प्रत्येक समाजाने दूर ठेवलं पाहिजे. सोशल मीडियाने डोकी फिरली आहेत. महाराष्ट्रात असं वातवरण कधीच नव्हतं” असं राज ठाकरे म्हणाले. एका पत्रकारने राज ठाकरेंना विचारलं की, शरद पवारांनी म्हटलेलं महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती निर्माण होईल, त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “शरद पवारांनी मणिपूर बनवायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवारांनी घेतली पाहिजे. त्यांचं आजपर्यंतच राजकारण पाहता, त्यांना हवय का नकोय मणिपूर सारखं”