‘पुणेकरांनो सतर्क राहा! आज रेड अलर्ट, खडकवासलातून विसर्ग’ वाढवणार
पुणे : धरणक्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं सध्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय.. त्यामुळं मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुण्यातल्या डेक्कन परिसरात नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीय. सिंहगड रस्त्यावरच्या एकता नगरमधल्या दोन सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय.. त्यामुळं 15 घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. पुलाची वाडी आणि प्रेमनगरमधल्याही 100 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या दृष्टीनं बंद करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. कोयना धरणक्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सध्या 27 हजार 16 क्युसेक्स, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक्स, पवनातून 5 हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘लाडक्या बहिणी’ला मुंबई हायकोर्टात आव्हान, पहिल्या हप्त्यावर मंगळवारी निर्णय
तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना आज हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. या तिन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दुसरीकडे ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत व सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे व त्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त, संबधित जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.