ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरकार नाशिक-मुंबई महामार्गावरील टोल बंद करणार?

मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिक ते ठाणे दरम्यान वाहतूक कोंडी

महाराष्ट्र : नाशिक-मुंबई महामार्गावर प्रचंड खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवत आहे. या खड्ड्यांमुळे प्रवाशांना कित्येक तास एकाच ठिकाणी गाडीमध्ये बसून राहावं लागत आहे. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाची दखल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे. दादा भुसे यांनी या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका मांडली. येत्या 10 दिवसांत महामार्गावरील खड्डे बुजवले नाहीत तर टोल संदर्भात आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं मोठं वक्तव्य दादा भुसे यांनी केलं आहे. दादा भुसे यांनी NHAI आणि उद्योजकांच्या बैठकीत याबाबतचं वक्तव्य केलं. त्यामुळे 10 दिवसात खड्डे दुरुस्त न झाल्यास आता महामार्गावरील टोल बंद केली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांच्या संदर्भात नाशिक शहरातील उद्योजक आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्यात आज संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला NHAI चे अधिकारी, हायवे पोलीस देखील उपस्थित होते. उद्योजकांनी 31 तारखेपर्यंत महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुदत दिली होती. महामार्गावरील खड्डे अद्याप ही जैसे थेच असल्याने उद्योजकांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. पालकमंत्री नेमके काय आदेश देतात याकडे देखील लक्ष होतं. अखेर या बैठकीत पालकमंत्र्यांनी मोठा इशारा दिला आहे. खड्डे दुरुस्त न झाल्यामुळे आता आगामी काळात थेट टोल बंद होण्याची शक्यता आहे.

दादा भुसे यांची प्रतिक्रिया काय?
पालकमंत्री दादा भुसे यांनी या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. “नाशिक-मुंबई प्रवासाला जास्त वेळ लागतोय हे खरं आहे. मागच्या आठ-दहा दिवसांपूर्वी मी स्वतः ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. भिवंडीला आपण बारा लेनचा रस्ता करतोय. या भागातील महामार्गावरील ४४ कट आम्ही ३-४ वर आणले आहेत. JNPT वरील माल भिवंडीला मोठ्या प्रमाणात गोडाऊन आहेत, तिथे जातात. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होतोय. त्यामुळे भिवंडी इथे २० किलोमीटर महामार्ग १२ लेन करतोय. जड वाहनांना महामार्गावर रात्री आणि दिवसा वेळ ठरवून दिली जाईल. लहान वाहनांना महामार्गावरील १-२ लेन राखून ठेवणार”, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली.

दादा भुसे याआधी काय म्हणाले होते?
विशेष म्हणजे दादा भुसे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांनादेखील प्रतिक्रिया दिली होती. “मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिक ते ठाणे दरम्यान वाहतूक कोंडी होते ही वस्तूस्थिती आहे. पुलांची कामे आणि खड्ड्यांमुळे ही वाहतूक कोंडी होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या वाहतूक कोंडीची दखल घेण्यात आली आहे.संबंधित यंत्रणेला खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, असं दादा भुसे म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button