पाऊस घेणार पुढील तीन दिवस ब्रेक
पुणे : जोरदार बँटींग नंतर पावसाने काल (शुक्रवार) पासून उसंत घेतली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ,मागील दोन आठवड्यांपासून कोकण किनारपट्टी, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात असलेला पावसाचा जोर शुक्रवारी (दि.26 जुलै) कमी झाला आहे. पुढील तीन दिवस किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ‘मला भ्रष्टाचाराचे सरदार बोलणाऱ्या अमित शाहांना सुप्रिम कोर्टाने तडीपार केलं होतं’; शरद पवारांचा पलटवार
दरम्यान, बुधवार आणि गुरुवारी असलेला पावसाचा जोर गुरुवारी रात्रीपासूनच कमी झाला आहे. घाटमाथ्यावर ही पावसाचा जोर कमी होता. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या 24 तासांत लोणावळ्यात 244 शिरगाव येथे 254 आंबोणे येथे 257 कोयना (नवजा) 237 खोपोली 221 ताम्हिणी 284 आणि भिरा येथे 230 मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाट परिसरात पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
गेले दोन दिवस पुण्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने शुक्रवारी पुण्यात विश्रांती घेतली. दिवसभरात एक-दोन हलक्या सरी पडल्या. शुक्रवारी दिवसभरात शिवाजीनगरमध्ये 1.2 आणि लवळे येथे 1.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.