‘एकदा कासव जिंकला म्हणून ससा नेहमीच हरेल’ असे नाही; सुधीर मुनगंटीवार
![Sudhir Mungantiwar said that just because the tortoise wins once, the hare always loses](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Sudhir-Mungantiwar-1-780x470.jpg)
मुंबई | लोकसभा निवडणुकीत आमचा काही ठिकाणी पराभव झाला. मात्र ‘एकदा कासव जिंकला म्हणून ससा नेहमीच हरेल’ असं नाही, असं मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या विदर्भाच्या बैठकीनिमित्त सुधीर मुनगंटीवार नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये देण्याचे जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांना सत्तेत येण्याचे जे ‘हसीन सपने’ होते ते भंग होतील अशी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनाबाबत अप्रचार करत आहे. या योजनेमुळे राज्य कर्जबाजारी होणार, असा अप्रचार केला जात आहे. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्याचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज आहे. आम्ही जेव्हा ४४ लक्ष शेतकऱ्यांना १४ हजार ७०० कोटीची माफी दिली,तेव्हा यांना वाटले की आता वीज माफ झाली.त्यामुळे आम्हाला विजेता करंट तर बसणार नाही ना अशी भीती निर्माण झाली होती.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत इंजीनियरिंग आणि ऑटोमेशन डिप्लोमामुळे मुली होणार सक्षम
काँग्रेसचे लोक तर माझी लाडकी बहीण योजनेचा इतका अपप्रचार करत आहेत की ते कधी म्हणतात यामुळे कर्ज होईल, कधी सांगताय आम्ही न्यायालयात जाऊ तर कधी अर्जामध्ये चुका शोधत राज्य सरकारला बदनाम करत आहे. काँग्रेसचे नेते राज्य सरकारची नाही राज्यातील बहिणींची, विद्यार्थ्याची आणि शेतकऱ्यांची बदनामी करत आहे, असा आरोप त्यांनी केला. आघाडीतील काही नेते मंत्रालयातील अधिकाऱ्यांना फोन करून सांगू लागले आहे, की आमचे सरकार आले की मी मंत्री होणार आहे. आत्तापासून जर आघाडीतील नेत्यांच्या व्यवहारात इतका अहंकार असेल तर तो जनताच उतरवेल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
लोकसभेत संख्येच्या आधारावर आम्ही निवडणूक हरलो, पण याचा अर्थ काय प्रत्येक निवडणूक आघाडी जिंकेल असे नाही. एकदा कासव जिंकला म्हणून ससा नेहमीच हरत राहिल असे नाही. आघाडीतील नेत्यांच्या मनात भीती निश्चित आहे. दोन कोटी ४८ हजार बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहे. भाजप पाच वर्षे जनतेचे संकल्प घेऊन काम करणारा पक्ष आहे, महाराष्ट्राची शक्ती वाढावी, स्थिरता राहावी ही भाजपची भूमिका राहिली आहे. मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत सध्या चर्चा नाही, पण विस्तारासाठी भांडायचे नाही असे महायुतीने ठरवले आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.