निर्मला सीतारामण यांनी १० वर्षात काय चमत्कार केला? संजय राऊतांचा सवाल
![Sanjay Raut said what miracle Nirmala Sitharaman did in 10 years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Sanjay-Raut-and-Nirmala-Sitharaman-780x470.jpg)
मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या लोकसभेत आज (२३ जुलै) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करतील. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. २०१४ साली पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून त्यांचा हा १३ वा अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पाआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, निर्मला सीतारमण यांनी काही फार मोठा चमत्कार केलाय असं नाही. आमच्या अपेक्षा खूप आहेत. आधीच्या पण अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. महागाई आणि बेरोजगारी हा देशासमोरील गंभीर प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने काही करावं. शेतकरी, जुनी पेन्शन योजना यावर काही असेल तर आम्ही समाधानी असू. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
हेही वाचा – ‘केंद्रातील मोदी सरकार निगरगट्ट’; नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंचं टीकास्र
केंद्र सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी फेटाळून लावली. त्यावरून केंद्र सरकारवर संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले की, बिहार आणि आंध्र प्रदेश सरकारच्या टेकूवर देशातील सरकार उभा आहे. दोन राज्यांना स्पेशल राज्याचा दर्जा देण्याचं वचन दिलं होतं पण ते सरकारने पाळलेल दिसत नाही. मुंबईची लूट आणि ओरबड केंद्र सरकारने थांबवलं पाहिजे. मुंबईत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय वित्त केंद्राची निर्मिती करताना सरकार दिसल तर आम्हाला आनंद होईल, असंही राऊतांनी म्हटलं.