लाडका भाऊ, लाडका बहीण योजना हे सरकारचे डाव; मनोज जरांगेंचा आरोप
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग निवडला आहे. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लाडकी बहीण योजनेवर टीका करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माजी खासदाराचे उदाहरण दिले. कुणाचेही नाव न घेता त्यांनी एका महिला खासदाराचा किस्सा सांगितला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी सरकारच्या योजनांचा विरोध करत नाही. पण सरकारने या योजना मधेच आणल्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळण्यात आता अडचणी येत आहेत. सरकारच्या संकेतस्थळावरही लोड आला असून तिथूनही कागदपत्रे डाऊनलोड करण्यात अडचणी येत आहेत. मागे एकदा एक महिला खासदार निवडणुकीच्या प्रचारात पिछाडीवर होती. त्यांच्या विरोधात माजी खासदार उभे होते. तेही मातब्बर होते. यामुळे महिला खासदाराने संपूर्ण जिल्ह्यात साडी आणि मंगळसूत्राचे वाटप केले. यामुळे महिला आणि पुरुष मतदारांमध्ये विभागणी झाली. महिलांनी महिला उमेदवाराच्या पाठी ताकद लावल्यामुळे घराघरात कलह निर्माण झाले होते. याप्रकारे आता लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेतून तीच तयारी सुरू आहे. मराठा, ओबीसी, धनगर बांधवांना आपापसात लढवून यांची लाडकी योजना सुरू आहे. कदाचित ते लाडकी मेव्हणी योजनाही आणतील. या योजनांमुळे लोक रांगेत लागले आहेत. ते रांगेत उभे राहूनच आनंदी आहेत. तेवढ्यात आचारसंहिता लागू होईल. एकदा निवडणूक झाली की, मग योजना बंद होईल.
हेही वाचा – चहामध्ये तूप टाकून पिणं खरंच आरोग्यदायी का? चला जाणून घेऊया..
विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी कागदपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागते. उत्पन्नाचा दाखला किंवा महत्त्वाचे कागदपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत. महसूल कर्मचाऱ्यांचा संपही सुरू आहे. अशात आता सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणली. यात सरकारचे दोन डाव दिसतात. एक म्हणजे या योजनेतून मतदान विकत घेण्याचा प्रकार होत आहे आणि दुसरे म्हणजे निवडणूक झाल्यानंतर योजना गुंडाळून टाकायची. आशा कितीतरी योजना आल्या आणि गेल्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.