“…तर मी विधानसभेची निवडणूक लढणार नाही”; बच्चू कडूंची मोठी घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-82-1-780x470.jpg)
Bacchu Kadu : लोकसभा निवडणुकींनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यादरम्यान प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “आम्ही राज्यातील महायुती सरकारला आमच्या मागण्यांचे पत्र देणार आहोत. या मागण्या जर मान्य झाल्या तर मी विधानसभेची निवडणूक न लढता माझी जागा महायुतीला सोडेन,” अशी घोषणा प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
“पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे रोजगार हमीमधून करावी, 50 टक्के नफा धरून शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, दिव्यांगाना 6 हजार रुपये प्रति महिना द्यावा, शिक्षण आणि आरोग्यामधील गरीब व श्रीमंतामधील विषमता वाढत चालली त्यात समता आणावी या 18 प्रकारच्या मागणी सरकारपुढे ठेवू. नाही तर आमची तिसरी आघाडी नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी तयार करू,” अशा पध्दतीने बच्चू कडू यांनी महायुतीला एकप्रकारे इशारा दिला आहे.
हेही वाचा – सर्वत्र पावसाची हजेरी, राज्यात तीन दिवस पावसाचे, कुठे-कोणता अलर्ट
“मी महायुतीमध्ये आहे, हे कोणी सांगितले? मी महायुतीत नाही. आम्ही महायुतीला पत्र लिहिणार आहोत. त्याच्याच शेतकऱ्याचे मुद्दे आणि दिव्यांग्यांचे मुद्दे या मागण्या करणार आहोत. या मागण्या मान्य झाल्यात तर मी विधानसभा लढणार नाही. माझी जागा मी महायुतीला देईल,” असं बच्चू कडू यांनी म्हटले आहे.