विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाचेही दोन आमदार फुटले? भाजप नेत्याचा मोठा दावा
![Ashish Shelar said that two MLAs of the Thackeray group also split in the Legislative Council elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Uddhav-Thackeray-1-780x470.jpg)
मुंबई | विधानसभेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. यानिवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसचे सात आमदार फुटल्याचा दावा करण्यात येत आहे. यातच भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसबरोबरच शिवसेना ठाकरे गटाचेही आमदार फुटल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात अन्य कोणत्याही पक्षाला स्थान मिळू नये, अशी ठाकरे गटाची कार्यपद्धती राहिली आहे. एकीडकडे लोकशाहीच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे लोकशाही विरोधात काम करायचं, अशी ठाकरे गटाची भूमिक आहे, याची अनेक उदाहरणं मागच्या काही दिवसात पुढे आली आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना मदत केली नाही. मुंबईत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कपिल पाटील यांना धाराशाही करण्याचं काम केलं. आता शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवामागेही ठाकरे गटाचा हात आहे.
हेही वाचा – शंभर टक्के २८८ पाडणार, मी सरकारला सावध करतोय’; मनोज जरांगेंचा इशारा
या निवडणुकीत भाजपाकडे मित्रपक्ष मिळून ११० आमदार होते. मात्र, आम्हाला ११८ मते मिळाली. शिंदे गटाकडे एकूण ४७ मते होती. मात्र, त्यांना ४९ मते मिळाली. तर अजित पवार गटाकडे एकूण ४२ मते होती. मात्र त्यांना एकूण ४७ मते मिळाली. याचा अर्थ महायुतीला एकूण १५ मते जास्तीची मिळाली. यापैकी सात मते काँग्रेसची फुटली असं मानले तरी बाकी ८ मते कोणाची होती? या आठ मतांमध्ये ठाकरे गटाची दोन मते होती. याची आम्हाला १०० टक्के खात्री आहे, असं आशिष शेलार म्हणाले.
विधानपरिषद निवडणुकीत भाजपाकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, संजय राऊत हे खोटी माहिती पसरवण्याचे बादशहा आहेत. आमच्य माहितीनुसार ठाकरे गटाचे त्यांच्याच आमदारांना पैसे वाटले. तरीही त्यांची दोन मते का फुटली. याचं उत्तर आधी संजय राऊतांनी द्यावं.