पाच वर्षांनंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही नीरा स्नान
संत तुकोबांच्या पालखी सोहळ्याला पुणे जिल्ह्यातून भक्तिमय निरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-72-1-780x470.jpg)
नीरा नरसिंहपूर : संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना पाच वर्षांनंतर नीरा नदीच्या पाण्याने शाही स्नान घालण्यात आले. त्यानंतर महापूजा आणि समाज आरती केली. पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम संपवून पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे लाखो वैष्णवांच्या साक्षीने मार्गस्थ झाली. पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाने पालखी सोहळ्यास भक्तिमय वातावरणात निरोप दिला.
संत तुकाराम महाराज पालखीच्या सराटीच्या मुक्कामी पहाटे चार वाजता काकडा आरती केली. त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पादुकांच्या चार पूजा झाल्या. सकाळी सात वाजता पुरुषोत्तम मोरे महाराज, भानुदास मोरे, अजित मोरे, संजय मोरे, अभिजित मोरे, माणिक मोरे, नितीन मोरे, बापूसाहेब मोरे महाराज, प्रल्हाद मोरे, बाळासाहेब मोरे, रामदास मोरे, अशोक मोरे यांनी परंपरेप्रमाणे पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने स्नान घातले. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना पाच वर्षांनंतर नीरा नदीच्या पाण्याने स्नान घातले. त्यानंतर नदीतच हजारोंच्या संख्येने जमलेल्या वैष्णवांच्या साक्षीने महापूजा व समाज आरती केली. भक्तांच्या व वारकऱ्यांच्या दर्शनासाठी पादुका सराटी येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवल्या होत्या.
हेही वाचा – आषाढी एकादशीनिमित्त सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन
तुकाराम महाराजांच्या पादुकांचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अप्पासाहेब गुजर, प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अभय तिडके, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, सुरेश सोनवलकर, सरपंच अनिशा तांबोळी, उपसरपंच संतोष कोकाटे, विस्तार अधिकारी युनूस शेख आदींनी दर्शन घेऊन पादुकांना पुणे जिल्ह्यातून सन्मानपूर्वक निरोप दिला. पालखी सोहळा प्रमुखांच्यावतीने प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचा फेटा, शाल, श्रीफळ देवून सन्मान केला.
जुलैचा एक आठवडा संपला व पालखीने पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करूनही पावसाअभावी राज्यातील धरणे कोरडी पडलेली आहेत. तर परिसरातही हुलकावणी दिल्याने शेतकरी व भाविकांनी पांडुरंगाला पावसासाठी साकडे घातले.
पालखी सोहळा सकाळी आठ वाजता पुणे जिल्ह्यातून नीरा नदीवरील पुलावरून लाखो वैष्णावांच्या आणि भक्तांच्या साथीने संतांच्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाला. सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मदनसिंह मोहिते पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आदींनी तोफांच्या सलामीने स्वागत केले. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला.