‘अधिवेशन होताच अजितदादांचे आमदार पक्ष सोडणार’; रोहित पवारांचं विधान

मुंबई | लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे. आता काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. याच अनुषंगाने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किती जागा लढवणार? याबाबत आमदार रोहित पवार यांनी सूचक भाष्य केलं आहे. तसेच अजित पवार गटाने आमदार संपर्कात आहेत का? यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे.
रोहित पवार म्हणाले, आमचं एक मत आहे, पण शेवटी निर्णय शरद पवार घेतील. तसेच त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते घेतील. आमचं मत असं आहे की, जर लोकसभेला मोठं मन दाखवून ठाकरे गटाला आणि काँग्रेस जास्त जागा दिल्या आहेत. आता त्यांनीही मोठं मन दाखवून विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जास्त जागा दिल्या पाहिजेत. शेवटी तो निर्णय त्यांचा आहे. पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की, कमीत कमी ८५ आमदार निवडून आणण्याची संधी शरद पवारांनी आम्हाला दिली पाहिजे.
हेही वाचा – ग्राहकांना धक्का! ATM मधून रोख रक्कम काढणे महागणार
अजित पवार गटात अनेक गोष्टी नॉर्मल आहेत असं वाटत नाही. अनेक लोक पक्ष सोडण्याचा विचारही करत आहेत. आमच्याही संपर्कात जे कुठले आमदार आहेत. त्या सर्वांची भूमिका आहे की, एकदा अधिवेशन होऊद्या. अधिवेशनामध्ये मतदारसंघासाठी निधी मिळू द्या. जे कुठले चांगले आमदार आहेत. ज्यांनी कधीही शरद पवारांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही किंवा विचाराच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही. असे लोक अधिवेशन झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं, असं रोहित पवार म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी तुमची तयारी आहे का? या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, प्रदेशाध्यक्ष पद रिकामं होणार नाही. जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सारख्या लोकांना काम करण्याची संधी जर पद आणि पदासकट मिळत असेल तर निश्चतच आवडेल. मात्र, कोणतं पद हे शरद पवार ठरवतील, असंही रोहित पवार म्हणाले.





