‘मावळमधून १ लाख ७२ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार’; संजोग वाघेरे
पिंपरी | लोकसभा निवडणूक नुकताच पार पडली असून उद्या (४ जून) निकाल जाहीर होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी जिंकण्याचा दावा केला आहे. १ लाख ७२ हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजोग वाघेरे म्हणाले की, लोकसभा निवडणूक हा एक वेगळा अनुभव आहे. एवढी मोठी निवडणूक ही माझ्या जीवनात पहिलीच आहे. २०१४ पासून लोकसभा लढवायची हे ठरवलं होत. माझे काही मित्र खासदार आणि आमदार झाले, मलाही वाटलं आपणही व्हावं. पुढे ते म्हणाले, मतदारसंघातील अपेक्षा आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रात आजपासून पूर्वमोसमी पावसाला होणार सुरुवात; जाणून घ्या आजचे हवामान अपडेट
दोन्ही वेळेस पक्षाचा आदेश असल्याने थांबलो. अखेर शिवसेना ठाकरे गटाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मतदारसंघातून मोठा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला. विरोधकांनी गद्दारी केली हे लोकांना पटलं नाही. पुढे ते म्हणाले, अजित पवारांनी मला ठाकरे गटात पार्थचा बदला घेण्यासाठी पाठवलं नाही. तसे अजित पवार यांच्याशी बोलणं झालं नाही. पण, २०१९ ला राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष होतो. ज्या उमेदवाराचे आपण काम केलं. त्याला निवडून आणता आलं नाही. याची चीड निश्चित आहे. एक्झिट पोलवर ते म्हणाले, बारणे जिंकतील हा जर तर चा प्रश्न आहे. उद्या कळेल कोण जिंकेल. मला विश्वास आहे महाविकास आघाडी जिंकेल, असंही संजोग वाघेरे म्हणाले.