‘देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी’; संजय राऊतांचा हल्लाबोल
![Sanjay Raut said that Devendra Fadnavis is the scumbag of Maharashtra's civilized politics](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Sanjay-Raut-780x470.jpg)
मुंबई | बारामतीमध्ये सरकारतर्फे ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. २ आणि ३ मार्च रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी बारामतीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रण मिळालेलं नाही. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, अशा प्रकाराचं राजकारण ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. सरकारी कार्यक्रमात सत्ताधारी पक्षाचा आमदार किंवा खासदार नाही म्हणून त्या व्यक्तिला बोलवायचं नाही असं कधीही होत नव्हतं. महारोजगार मेळावा हा काही यांच्या माता-पित्यांचा आहे का? महारोजगार मेळावा सरकारी योजना आहे, ती भाजपाची किंवा शिंदे गँगची योजना नाही.
हेही वाचा – शिंदे गटाच्या आमदाराची पोलिसांसमोर युवकांना काठीने मारहाण, व्हिडीओ व्हायरल
विद्यमान खासदार आणि आमदार हे सरकारी योजनांचा भाग असतात. तरीही सरकार शरद पवारांना बोलवत नाही? अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण हे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी सुरु केलं आहे. त्याआधी असं डर्टी पॉलिटिक्स अलिकडे सुरु झालं आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
हा कोणता खेळ चालला आहे राज्यात? पैसे तुमच्या घरच्या झाडाला आलेत का? वर्षा बंगल्यावर, सागर बंगल्यावर, देवगिरी बंगल्यावर जी झाडं आहे त्यांना खोके लागलेत का? तिथे जमिनीतून खोके उगवत आहेत का? मर्जीप्रमाणे कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार, खासदारांना निमंत्रण देत नाही हा कुठला प्रकार आहे? केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर, महानुभव सत्तेत आल्यापासून ही वाळवी सुसंस्कृत राजकारणाला लागली आहे, असंही संजय राऊत म्हणाले.