‘दोन आपत्यावर थांबा, लोकसंख्या खूप वाढली’; अजित पवार यांची पिंपरीत फटकेबाजी
पुणे | एक किंवा दोन आपत्यावर थांबा. खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने खुपचं वाढली असून काही दिवसांनी ब्रह्मदेव आला तरी घरं बांधून देऊ शकणार नाही, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार पिंपरीत पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, मी १९९१ ला पिंपरी-चिंचवडमधून पहिल्यांदा खासदार झालो, तेव्हाची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या किती झाली आहे. झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे एक किंवा दोन अपत्यावर थांबावे. नाही तर ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घरे बांधून देऊ शकत नाही. त्यामुळे सरकारबरोबर नागरिकांचीही जबाबदारी आहे.
हेही वाचा – ‘प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात १५ लाख सदनिका’; उपमुख्यमंत्री अजित पवार
सोडतीमध्ये घर मिळाले नाही म्हणून नाराज झाले तरी चालेल परंतु निराश मात्र होऊ नका, निराशा वाईट असते. निराश होऊन हिम्मत हारू नका. निर्व्यसनी रहा, घर मिळाले नाही म्हणून पैसे उधळत बसू नका, चौफुला, टेंभुर्णीला जाऊ नका. पैसे साठवा, त्यात भर घाला. घराचे स्वप्न एक दिवस पूर्ण होऊल, असं अजित पवार म्हणाले.
सोडत पारदर्शक आहे. एकाही माणसाचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे गैरप्रकार होण्याची कोणतीही संधी नाही. कोणताही दलाल महापालिकेने नेमला नाही. नंबर काढून देतो म्हणणाऱ्यांची तक्रार करा, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, अशा शहाण्यांना सोडणार नाही. साला म्हणणार होतो पण नको शहणाचा म्हणतो, असंही अजित पवार म्हणाले.