म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : १६९ विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यास १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकत्याच काढलेल्या सोडतीतील ४०८२ विजेत्यांना स्वीकृती पत्र पाठविण्यात आले असून विहित मुदतीत १६९ यशस्वी विजेत्यांनी स्वीकृती पत्र सादर केलेले नाही. त्यामुळे १६९ विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या अर्जदारांकडून १ सप्टेंबर २०२३ पर्यंत कोणताही प्रतिसाद प्राप्त न झाल्यास त्यांचा नकार ग्राह्य धरून प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातर्फे देण्यात आली आहे.
सोडतीतील ४०८२ सदनिकांपैकी ३४६२ यशस्वी अर्जदारांचे स्वीकृती पत्र मंडळास प्राप्त झाले आहेत. ७७ विजेत्या अर्जदारांनी उत्पन्नाबाबत आक्षेपार्ह माहिती सादर केल्याचे मंडळाच्या निदर्शनास आल्याने त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला असल्याने या अर्जांवरील कार्यवाही प्रलंबित आहे. ३७० अर्जदारांनी त्यांना सोडतीत प्राप्त झालेली सदनिका मंडळाला परत करण्याबाबतचा निर्णय कळविला आहे. यामध्ये प्रामुख्याने असे अर्जदार आहेत ज्यांना सोडतीत एकापेक्षा अधिक सदनिका मिळाल्या आहेत, असे मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
मुंबई मंडळाने ४,०८२ घरांसाठी १४ ऑगस्ट रोजी सोडत काढली होती. या सोडतीमधील ४,०८२ विजेत्यांना मंडळाने स्वीकृती पत्र पाठविले आहेत. या पत्रानुसार विजेत्यांना घराची स्वीकृती नमूद करायची असते. तसेच काही कारणाने घर परत करायचे असल्यास या पत्राद्वारे कळविणे आवश्यक असते. मात्र विहित मुदतीत १६९ विजेत्यांनी स्वीकृती पत्र सादर केलेले नाही. त्यामुळे या १६९ विजेत्यांना स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी १ सप्टेंबर २०२३ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.