जग्गी वासुदेव यांच्याकडून छत्रपती शिवाजी महारांजांचा आपमान?
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. जग्गी वासुदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटी माहिती पसरवून त्यांचा अपमान केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सरकारने याबाबत कायदेशीर कारवाई करावी अन्यथा जनक्षोभ उसळेल, असा इशारा दिला आहे.
जग्गी वासुदेव याने छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (आणि अँनिमेशन) प्रसारित केली आहे ज्यानुसार रामदास हा शिवाजींचा गुरु होता. रामदासाला भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले. रामदासाच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा घेवून भिक्षा मागू लागले. पुढे रामदासाने स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देवून त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले आणि ते राज्य शिवाजींचे नाही हे ध्यानी ठेवत राज्य करायला सांगितले. छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल अन्यथा याने जनक्षोभ उसळेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.