“राज्याची बदनामी करण्यासाठी असा बायस राज्यपाल भाजपने मुद्दामून बसविला होता”; नाना पटोले
सर्वे नुसार राज्यात महाविकास आघाडीचे 38 खासदार निवडून येणार
भाजपने राज्यपालांच्या हस्ते जेवढी बदनामी करून घ्यायची होती तेवढी करून घेतली
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राज्यभरातून विरोधी पक्षाचे नेते आनंद व्यक्त करत आहेत. राज्यात राज्यपालांच्या जाण्याने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आता यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
भाजपने जेवढी बदनामी राज्यपाल महोदय यांच्या हस्ते करून घ्यायची होती तेवढी त्यांनी करून घेण्याचं काम केलं असे त्यांना वाटत असेल म्हणून राज्यपालांना त्या पदावरून हटविण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्या पद्धतीने महापुरुषांचा अपमान केलेला आहे ते या राज्यातील जनता विसरणार नाही. राज्याची बदनामी करण्यासाठी असा बायस राज्यपाल भाजपने मुद्दामून बसविला होता, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
सर्वे नुसार राज्यात महाविकास आघाडीचे 38 खासदार निवडून येणार आहेत. यात मोठा वाटा राज्यपालांचा आहे आणि हे लक्षात आल्यावर भाजपने नरेंद्र मोदी यांनी त्यांची खुर्ची कायम राहावी यासाठी त्यांनी राज्यपालांचा राजीनामा मंजूर केला आहे. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान राज्यपालांच्या खुर्चीवर बसून राज्यपाल करत होते. त्यावेळेस जनतेने, काँग्रेस पक्षांने आवाज उचलला. राष्ट्रपती महोदयांना आम्ही कळवलं राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, असंही नाना पटोले म्हणाले.
पुण्याच्या पोट निवडणुकीमध्ये देशाच्या गृहमंत्र्याला प्रचाराला यावं लागतं याचा अर्थ असा आहे की भाजपच्या बद्दलचा विश्वास जो निर्माण झाला होता, मोठ्या विश्वासाने जे काही स्वप्न भाजपने देशाची सत्ता आणि राज्याची सत्ता घेण्यासाठी दाखवले होते ते सगळे स्वप्न भंग करण्याचं काम भाजपने केलं आहे. म्हणून आता या पोट निवडणुकीला स्वतः अमित शहा यांना प्रचाराला यावं लागत आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.