टी-२० विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती
मुरली विजय नंतर अजुन एका भारतीय खेळाडुची निवृत्ती
Joginder Sharma : भारतीय संघाने २००७ साली टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी विश्वचषकात फायनलच्या सामन्यात भारतीय गोलंदाज जोगिंदर शर्मा हिरो ठरला होता. या जोगिंदरने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. ३९ वर्षीय जोगिंदरने ट्विट करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
जोगिंदर शर्माने ट्विटरवर पत्र शेअर केले आहे. त्यात, मी बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज आणि हरियाणा सरकारचे आभार मानतो. चाहते, कुटुंब, मित्र आणि ज्यांनी मला कारकिर्दीतील चढ-उतारांवर साथ दिली त्यांचेही मी आभार मानतो, असं म्हटलं आहे.
हरियाणातील रोहतक येथून आलेल्या जोगिंदर शर्माने भारतासाठी फक्त ४ वनडे आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्व टी-२० सामने केवळ विश्वचषकात खेळले आहेत. २००४ मध्ये त्याने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि २००७ मध्ये शेवटचा सामना खेळला आहे. तो आत्ता हरियाणा पोलिसमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहे.
जोगिंदर शर्माचे ऐतिहासिक षटक-
२००७ च्या फायनलमध्ये पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या शटकात १३ धावांची गरज होती. यावेळी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने जोगिंदरला गोलंदाजी करण्याची संधी दिली होती. यावेळी भारत संघ अंतिम सामना ५ धावांनी जिंकला होता.