शरद पवारांवरील विधानावरून संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सूचक सल्ला
![Sanjay Raut's suggestive advice to Prakash Ambedkar on his statement on Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/prakash-ambedkar-and-sanjay-raut-780x470.jpg)
प्रकाश आबंडेकरांनी काय विधान केले माहिती नाही, परंतु अशाप्रकारे कुणीही विधाने करू नये
मुंबई : शिवसेना-ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केली. मात्र काही दिवसांतच युतीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना सूचक सल्ला दिला आहे.
प्रकाश आबंडेकरांनी काय विधान केले माहिती नाही. परंतु अशाप्रकारे कुणीही विधाने करू नये. शरद पवार हे महाराष्ट्रातले नव्हे तर देशात भाजपाविरोधात जी आघाडी निर्माण होतेय त्याचे ते स्तंभ आहेत. सातत्याने ते आघाडीचे प्रयत्न करतायेत. भाजपाच्या नियंत्रणेतील संस्थांनी सर्वात जास्त हल्ले हे शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर केले आहेत हे विसरता येणार नाही. त्याचसोबत सध्या प्रकाश आंबेडकर आणि वंचितसोबत शिवसेनेशी युती झाली आहे. ही घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी केलीय. आमची अपेक्षा आहे प्रकाश आंबेडकर हे भविष्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे. जर असे होणार असेल आणि ही प्रक्रिया सुरू असेल तर या आघाडीचे प्रमुख स्तंभ आहेत. नेते आहेत. त्यांच्याविषयी एकमेकांविषयी आदर ठेऊन बोललं पाहिजे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या विधानावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
महाविकास आघाडी होणार असं मला वाटते. पण ते वरिष्ठ नेते ठरवतील. प्रकाश आंबेडकर जे बोलले त्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतली आहे. सत्ता असो किंवा नसो आम्ही शरद पवारांबद्दल काहीही बोलले सहन करणार नाही. सत्ता ही फार महत्त्वाची आहे असे नाही. माझ्या ३५ वर्षातील आयुष्यात केवळ ३ वर्ष मंत्री होतो. ३२ वर्ष रस्त्यावरच गेली. त्यामुळे फरक काय पडतो. ज्या बापाला आपण बाप मानलाय त्याबद्दल कुणी असे बोलले तर मी विरोध करेन. एकटा असलो तरी विरोध करेन, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले..
शरद पवार हे भाजपाचेच आहे. त्यांच्याबद्दलचे माझे मत कालही तेच होते. आजही तेच आहे. हे सगळ्यांसाठी धक्कादायक विधान असले तरी ते माझ्यासाठी नाही. तुम्ही डोळेझाक करून चालला आहात. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांची मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितले की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचे ठरले होते. मी फक्त पहिला गेलो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.