‘कॉसमॉस’च्या सर्वसाधारण सभेत सभासदांकडून संचालक मंडळावर आरोप
पुणे – दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेवर नुकताच पडलेला सायबर दरोडा आणि बँकेच्या आर्थिक सद्यस्थितीबाबत रविवारी बँकेच्या सर्वसाधारपण सभेत काही सभासदांकडून बँक प्रशासन आणि संचालक मंडळावर गंभीर आरोप करण्यात आले. मात्र, ठेवीदारांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून, बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी केला आहे.
ऑगस्टमध्ये बँकेच्या सव्र्हरवर हल्ला झाला होता. त्यात तब्बल ९४ कोटी रुपये लांबविण्यात आले आहेत. या पाश्र्वभूमीवर बँकेची ही ११२ वी सर्वसाधारण सभा रविवारी शिवशंकर सभागृहात झाली. या वेळी काळे यांच्यासह, बँकेचे समूह अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर, उपाध्यक्ष गोविंद क्षीरसागर, ज्येष्ठ संचालक कृष्णकुमार गोयल, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले आणि इतर संचालक उपस्थित होते.
सभेमध्ये काही सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. सायबर हल्ल्यामध्ये बँकेला झालेल्या नुकसानीचा मुद्दा त्यात प्रामुख्याने होता. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये नियमबाह्य़ पद्धतीने कर्ज कसे दिले गेले, बँकेला तोटा का झाला, अनुत्पादित कर्जामध्ये (एनपीए) वाढ का होते आहे, लाभांश का कमी करण्यात आला आदी प्रश्न सभेत उपस्थित करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष सनदी लेखापाल असतानाही बँकेचे कामकाज समाधानकारक नाही. त्याचप्रमाणे बँकेवरील सायबर हल्ल्याला संचालक मंडळ जबाबदार असून, ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप काही सभासदांनी केला.