मोठी बातमी ः हिवाळी अधिवेशनापूर्वीच सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच दुसरा विस्तार कधी होणार याची चर्चा सुरू झाली होती. पहिल्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या नेत्यांमध्ये कमालीची नाराजी होती. दरम्यान शिंदे- फडणवीस सरकार नाराज नेत्यांची नाराजी दूर करणार आहे. पहिल्या मंत्रिमंडळापासूनच दुसरा मंत्रिमंडळ विस्तारा कधी होईल, याची उत्सुकता लागली होती. ही उत्सुकता सरकार ऐन गुलाबी थंडीतील हिवाळी अधिवेशनापूर्वी मिटवणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील, तसेच भाजपमधील आमदारांपैकी अनेक इच्छुक मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. विशेषतः शिंदे यांच्या पक्षातील आमदारांची अस्वस्थता सातत्याने दिसून येते. नेत्यांची ही चिंता आता मिटणार आहे. अधिवेशनाच्या आधीच मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली. ‘विस्तारानंतर सर्वच चर्चांना विराम मिळेल,’ असेही जैस्वाल म्हणाले.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला स्थान मिळेल, याची चर्चा होत असताना काही आमदार उघडपणे विस्तार होत नसल्याने नाराजीही व्यक्त करताना दिसत आहेत.तसेच महाविकास आघाडीतील नेतेही या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे उत्सुकतेने पाहत आहेत. त्यामागे कारण असं आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास आहे की, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे-सरकारमध्ये फुट पडेल. शिंदे यांच्या पक्षातील अनेक अस्वस्थ आमदार मंत्रीपद न मिळाल्याने पुन्हा एकदा बंडखोरी करणार, अशी वक्तव्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहेत. शिवाय शिवसेना नेत्यांनी सन 2023 मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार, असाही दावा केला आहे.
नाराज नेते आनंदी होणार
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच विस्तार होईल,’ असे आशिष जैस्वाल म्हणाले. दरम्यान, पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये औरंगाबादचे संजय शिरसाट; तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची नाराजी वारंवार दिसून आली. बच्चू कडू यांनी तर मोठे शक्तिप्रदर्शन केले.