दोन्ही हातांनी पकडून आव्हाडांनी मला पुरुषांच्या अंगावर ढकललं, रिया राशिद यांनी सांगितली आपबिती
![He grabbed me with both hands and pushed me on top of the men, says Riya Rashid](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Riya-Rashid-750x470.jpeg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप भाजपाच्या महिला पदाधिकारी रिया राशिद यांनी केला आहे. ठाणे-कळवा येथील तिसऱ्या कळवा पुलाच्या उद्घाटनादरम्यान हा प्रकार घडला. या सर्व प्रकरणात आतापर्यंत प्रत्येकाने आपली बाजू मांडली. आता तक्रारदार महिला रिदा राशीदही यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मला दोन्ही हातांनी पकडून पुरुषांच्या अंगावर ढकललं असं त्या म्हणाल्या. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना कालच्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली.
रिदा राशीद यांनी संपूर्ण घटनाक्रम पत्रकार परिषद विषद केला. त्या म्हणाल्या की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला उभे होते. त्यानंतर खूप गर्दी झाली. उद्घाटनावेळी खूप गर्दी होती. उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री जायला निघाले. त्यांना भेटता यावं याकरता मी पुढे निघाले. त्यांच्या पीएंकडून मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. सगळेच जायला निघाले. तेवढ्यात मुख्यमंत्री गाडीत जाऊन बसले. म्हणून मीही गाडीला चिकटूनच गाडीच्या दरवाजाजवळ जात होते. तेवढ्यात समोर आमदारसाहेब दिसले. ते स्थानिक आमदार असल्याने मी त्यांच्याकडे बघून स्मितहास्य दिलं. पण त्यांनी तू इथे काय करतेयस असं म्हणून मला दोन्ही हाताने बाजूला ढकललं. त्यांनी जिथे ढकललं तिथे पुरूष होते. त्यांनी मला अक्षरशः पुरुषांच्या अंगावर ढकललं, असं रिदा राशीद म्हणाल्या.
हा सर्व प्रकार झाल्यानंतर मी डीसीपींकडे गेले. त्यांनी मला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यास सांगितलं. तेवढ्यात माझ्या हातात व्हिडीओ आला होता. त्यामुळे व्हिडीओच्या आधारे मी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी हात लावल्यावर मला जी फिलिंग झाली ती मी स्टेटमेटंला दिली आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी महिला आयोगानेही या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती केली आहे. महिला आयोगाने स्वतःहून या प्रकरणात पुढाकार घेतला पाहिजे. मी नक्कीच त्यांच्याकडे जाईन, पण ते स्वतःहून आले तर आवडेल, असंही रिदा राशीद म्हणाल्या. महिलांना दोन्ही हाताने बाजूला ढकलणं चांगलं नाही. जे कायद्यात आहे, जे सर्वांकरता आहे तो नियम त्यांनासुद्धा लागू आहे. भाजपा म्हणून लोक मला ओळखत नाही. मी सामाजिक कार्य करते म्हणून लोक मला ओळखतात. पण तरीही यात राजकारण आणलं जातंय, अशी टीकाही रिदा राशीद यांनी केली आहे.