‘एरोसोल’ प्रदूषणात महाराष्ट्र ‘अतिधोकादायक’ वर्गात कोलकातामधील ‘बोस इन्स्टिटय़ूट’चा अभ्यास
नागपूर : महाराष्ट्रातील ‘एरोसोल’ प्रदूषणाचे प्रमाण हे सध्याच्या ‘धोकादायक’ पातळीवरून ‘अति धोकादायक’ पातळीवर जाण्याची शक्यता आहे. कोलकाता येथील बोस इन्स्टिटय़ूटने केलेल्या अभ्यासातून हा इशारा देण्यात आला आहे. ‘अ डिप इन्साईट इनटू स्टेट-लेव्हल एरोसोल पोल्यूशन इन इंडिया’ हा ताजा अभ्यास कोलकाता येथील बोस इन्स्टिटय़ूटमधील सहयोगी प्राध्यापक डॉ. अभिजित चटर्जी आणि त्यांच्या पीएचडीच्या विद्यार्थिनी मोनामी दत्ता यांनी केला. या अभ्यासाद्वारे ‘एरोसोल’ प्रदूषणाचे राष्ट्रीय पातळीवरील चित्र मिळाले.
देशातील विविध राज्यांचे दीर्घकालीन कल (२००५-२०१९), स्रोत विभागणी आणि भविष्यातील शक्यता मांडल्या आहेत. महाराष्ट्र सध्या ‘धोकादायक’ वर्गात असून यात एओडीचे (एरोसोल ऑप्टिकल डेप्थ) प्रमाण ०.४ ते ०.५ इतके आहे. मात्र ‘एरोसोल’च्या वाढत्या प्रदूषणामुळे ते वाढून ०.५ या पातळीच्या पलीकडे पोहचून ते ‘अति धोकादायक’ वर्गात जाण्याची शक्यता आहे.
औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, घनकचरा जाळणे आणि वाहनांद्वारे होणारे उत्सर्जन हे महाराष्ट्रातील ‘एरोसोल’ प्रदूषणाचे मुख्य स्रोत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. या स्रोताचे मूल्यमापन २००५ ते २००९, २०१० ते २०१४ आणि २०१५ ते २०१९ अशा तीन टप्प्यांवर करण्यात आले. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राच्या उत्सर्जनाचा वाटा दुसऱ्या टप्प्यापेक्षा तिसऱ्या टप्प्यात ३१ वरून ३९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. घनकचरा जाळण्याने होणारे एरोसोल प्रदूषणाचे प्रमाण २४ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आले आहे, तर वाहनांद्वारे होणाऱ्या उत्सर्जनाचे प्रमाण (१४ ते १५ टक्के) तीनही टप्प्यांमध्ये सातत्याने राहिले आहे. महाराष्ट्रात कोळसाधारित औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांचा प्रभाव खूप मोठा आहे. तो कमी करण्यासाठी सध्याच्या औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांची क्षमता किमान दहा गिगा वॅटने कमी करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.
– मोनामी दत्ता, वरिष्ठ संशोधक, फेलो बोस इन्स्टिटय़ूट, कोलकाता
महाराष्ट्रातील हवाप्रदूषणावर आत्तापर्यंत सर्वाधिक परिणाम हा कोळसाधारित विद्युतनिर्मिती प्रकल्पांमुळे झाला आहे. विजेच्या वाढत्या मागणीनुसार विद्युत प्रकल्पांची क्षमता वाढवली जात आहे. ती अशीच सुरू राहिली तर राज्याचा समावेश सर्वाधिक धोकादायक पातळीवर होईल.
– प्रा.डॉ. अभिजित चटर्जी, सहयोगी प्राध्यापक, बोस इन्स्टिटय़ूट, कोलकाता