बिश्नोई गँगने अल्पवयीन मुलाला दिली होती सलमान खानला मारण्याची सुपारी
मध्यंतरी सलमान खान आणि लॉरेंस बिश्नोई ही दोन नावं चांगलीच चर्चेत होती. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर लॉरेंस बिश्नोईने सलमान खानला संपवायचा कटही रचला होता. खरंतर सिद्धूच्या आधीच सलमानला त्याच्या फार्महाऊसवर मारायचा कट लॉरेंसने रचला होता पण त्यात त्याला अपयश आले. आता या प्रकरणात आणखीन काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
पंजाब पोलिस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर चौकशी करताना दिल्ली पोलिसांच्या खास टीमच्या हाती २ संदिग्ध व्यक्ती लागल्या. त्यातील एक मुलगा हा अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. शिवाय याच अल्पवयीन मुलावर बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मारायची जबाबदारी सोपवण्यात आली होती असं स्पष्ट झालं आहे.
अर्शदीप सिंग हे त्या मुलांचं नाव आहे. विस्फोटक बाळगल्याप्रकरणी त्यांना हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीवरून असं स्पष्ट होत आहे की लॉरेंस बिश्नोई याने पंजाबचा गँगस्टर जग्गू भगवानपुरिया याच्या टोळीबरोबर याच अर्शदीपला हाताशी घेऊन सलमानला मारायचा कट रचला होता. अर्शदीपबरोबर दीपक आणि दागर अशा २ गुंडांनाही या कटात त्यांनी सामील केलं होतं. त्यांच्यापैकी एक फरार आहे आणि एक तुरुंगात आहे.
लॉरेंसने याआधीही सलमानला २ वेळा मारायचा प्रयत्न केला होता. सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर त्याला ठार मारायचा प्लॅन तर खूप बारकाईने त्याने आखला होता. सिद्धूच्या हत्येनंतर त्याने सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही पत्र लिहून जीवे मारण्याच्या धमकी दिली होती. यानंतर बांद्रा पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केली. असं म्हंटलं जातं की राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणानंतरच सलमान लॉरेंसच्या निशाण्यावर आला होता.