आदित्य ठाकरेंचं ठरलं… दापोलीत जाऊन रामदास कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार
रत्नागिरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे १६ सप्टेंबर रोजी कोकणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरे रामदास कदम आणि आमदार कदम यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे नेते सूर्यकांत दळवी यांनी दिली. दळवी यांनी यावेळी रामदास कदम आणि योगेश कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सध्या राजकारणात उलथापालथ झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्याचा समाचार घेण्यासाठी आणि बंडखोरीची कीड गाडण्याचं आव्हान आदित्य ठाकरे स्वीकारलं असल्याचं सूर्यकांत दळवी म्हणाले.
आदित्य ठाकरे कोकणात रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून १६ सप्टेंबर रोजी दापोलीत आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा येणार आहे. त्या दिवशी या मतदारसंघातही रामदास कदम व आमदार योगेश यांनी केलेल्या गद्दारीलाही उत्तर दिले जाईल या सभेत जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी दळवी यांनी या मतदारसंघात लागलेली गद्दारीचा उल्लेख करत रामदास कदम व आमदार योगेश कदम यांचे नाव घेण्याचे टाळले. १६ रोजी दुपारी ४ वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयासमोर आझाद मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख ऋषि गुजर,किशोर देसाई, संदीप चव्हाण,नरेंद्र करमरकर आदी उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद या मतदारसंघात मिळेल. काही महिन्यांपूर्वी मागच्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली त्याच ठिकाणी आता निष्ठा यात्रेची सभा होईल. त्याच ठिकाणी या मतदारसंघात खरे गद्दार कोण आहेत हे कळेल जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही दळवी यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान सूर्यकांत दळवी गट व रामदास कदम गट आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जातीय. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी सूर्यकांत दळवी यांच्याकडून करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असलेले आदित्य ठाकरे दापोली मतदारसंघात काय बोलणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यापासून त्यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याविषयी आदर व्यक्त करत त्यांनी आजवर कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आता आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या निमित्तानं काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे ठाकरे या सगळ्याबाबत कोणती भूमिका मांडतात याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले असून या दौऱ्यात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.