ठाण्यात म्हस्केंच्या बॅनरवर उद्धव ठाकरेंचा फोटो!; तर राजन विचारे कोणासोबत?, चर्चा रंगल्या
![Photo of Uddhav Thackeray on Mhaske's banner in Thane !; So, with whom did Rajan think?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Photo-of-Uddhav-Thackeray-on-Mhaskes-banner-in-Thane-So-with-whom-did-Rajan-think.jpg)
ठाणे | एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाणे शहरामध्ये त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यापैकी नरेश म्हस्के यांनी लावलेल्या बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे छायाचित्र असल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या समर्थनात नरेश म्हस्के यांनी लावलेल्या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र लावण्यात आले नव्हते. त्यानंतर शिवसेनेकडून हकालपट्टीची कारवाई होत असल्याची कुणकुण लागल्याने म्हस्के यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे नरेश म्हस्के हे शिंदे गटामध्ये सहभागी झाली असले तरी शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर म्हस्के यांच्या बॅनरवर पुन्हा उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र अवतरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवरून उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र फोटो काढून टाकण्यात आले होते. माजी महापौर नरेश म्हस्के यांनीही त्यावेळी लावलेल्या बॅनरवर ‘साहेब आम्ही तुमच्यासोबत’ आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वालांना असा संदेश त्यावर होता. म्हस्के यांच्या या भूमिकेनंतर शिवसेनेकडून त्यांची हकालपट्टी होणार होती. परंतु या हकालपट्टीची कुणकुण लागल्याने म्हस्के यांनी जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा दिल्याचे घोषित केले. मात्र म्हस्के यांनी आता शहरातील उड्डाणपुलांवर बॅनर लावले असून त्यावर उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचीही छायाचित्रे आहेत. मात्र त्यावर शिवसेना किंवा धनुष्यबाण अशी चिन्हे किंवा पक्षाचे नाव नाही.
राजन विचारे कोणासोबत?
राज्यात गेली दहा ते पंधरा दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू असताना ठाण्याचे खासदार राजन विचारे नेमके कुठे आहेत? अशी चर्चा सुरू झाली होती. राजन विचारे मातोश्रीच्या संपर्कात असल्याची व त्यांच्यावर ठाण्याची जबाबदारी दिल्याचेही बोलले जात होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने शहरांच्या नामकरणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे समर्थन केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच ते अमरनाथ यात्रेला गेले. यात्रेहून परतल्यानंतर विचारे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.