शिंदे सरकारमध्ये दक्षिण महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
कोल्हापूर: राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप तसेच अपक्ष आघाडीची सत्ता आल्यानंतर संभाव्य मंत्रिमंडळात दक्षिण महाराष्ट्रातील भागातील आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे, शंभुराज देसाई, अनिल बाबर, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर अशी अनेक नावे चर्चेत आहेत.
दक्षिण महाराष्ट्रात शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले सर्वच आमदार शिंदे गटात गेले आहेत, यातील अनेकांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. त्या सर्वांनाच मंत्रिपदाचे बक्षीस मिळणार, का असा प्रश्न विचारला जात आहे. या पदाच्या शर्यतीत सेनेचे अनेक दिग्गज नेते आहेत. त्यामुळे ४० पैकी नऊ ते दहा ते बारा आमदारांनाच मंत्रिपद मिळू शकते. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील दोन किंवा तीन आमदारांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात चौघांत मंत्रिपदासाठी मोठी चुरस होणार आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर प्रकाश आवाडे तातडीने भाजपमध्ये सहभागी झाले. यामुळे त्यांना मंत्रिपदाचे बक्षीस निश्चित मिळणार अशी चर्चा आहे. याशिवाय विनय कोरे यांचे नाव चर्चेत आहे. निवडणुकीनंतर त्यांनीही भाजपला पाठिंबा दिला होता. जिल्ह्यातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आबिटकर एकमेव आमदार होते; पण त्यांना मंत्री न करता यड्रावकर यांना संधी देण्यात आल्याने आबिटकर नाराज झाले. या नाराजीतून त्यांनी शिंदे गटासोबत जाणे पसंत केले. शिवसेनेने मंत्रिपद दिल्यानंतरही शेवटच्या क्षणी यड्रावकर शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे यड्रावकर की अबिटकर असा मोठा प्रश्न शिंदे यांच्यासमोर उभा राहण्याची शक्यता आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागरही या गटात गेल्याने त्यांचे पद कायम राहण्याची चिन्हे आहेत.
अधिक शक्यता कारण काय?
– शंभुराज देसाई – ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री – शिंदेंबरोबर जाणारे पहिले मंत्री
– अनिल बाबर – सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार
– प्रकाश आवाडे – अपक्ष निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा