राष्ट्रवादीने पाण्याचे राजकारण करू नये, पक्षनेते एकनाथ पवार यांचा विरोधकांना टोला
पिंपरी ( महा ई न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस 15 वर्षे सत्तेत होती. मात्र, त्या काळात त्यांना आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणता आले नाही. तसेच, पवना बंद जलवाहिनी योजना पूर्ण करता आली नाही. त्यामुळे शहरात काही तांत्रिक कारणाने कमी दाबाने पाणी पुरवठा होत असताना राष्ट्रवादीने पाण्याचे राजकारण करु नये, असा टोला पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी टंचाईच्या कारणावरून महापालिकेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना कार्यालयात कोंडले तसेच सत्ताधारी व प्रशासनावर आरोप केले. त्याला उत्तर देताना पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीने पाण्यावरून राजकारण करू नये. शहरासाठी अधिकचे पाणी घेण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहेत. त्या दृष्टीने यशस्वी पाठपुरावा सुरू आहे. पुढील आठवड्यात आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी साठ्याला परवानगी देण्याबाबत बैठक आहे. त्यात त्यावर अंतिम निर्णय होणार आहे. पवना बंद जलवाहिनीतून पाणी आणण्यासाठी शेतकर्यांशी सदनशील मार्गाने चर्चा सुरू आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असे ते म्हणाले.
तसेच महापुरूषांच्या जयंती उत्सव आणि सण महापालिकेने साजरे करू नयेत, असे उच्च न्यायालयासह राज्य शासनाने निर्देश आहेत. तरीही, महापुरूषांचे विचार नागरिकांमध्ये पोहचावेत म्हणून खासगी तत्वावर प्रबोधन विचार पर्व साजरा केला जात आहे. महापालिकेकडून स्मृतिचिन्ह देण्याची परंपरा भाजप सत्ताधार्यांनी बंद केली आहे. त्यामुळे खासगी संस्थांकडून कार्यक्रमावर खर्च केला जात आहे. त्या संस्थाकडून अवधानाने महापालिकेचे लोगो वापरून स्मृतिचिन्ह बनविले गेले. त्या संदर्भात संबंधितांना समज दिली आहे, असे सांगून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, विरोधकांनी महापुरूषांच्या नावाने कोणी ही पक्षीय राजकारण करू नये. असेही त्यांनी म्हटले आहे.